बंदी उठवून मैदानी खेळ सुरू करावेत
विविध क्रीडा क्षेत्रातील संघटनांची लोकप्रतिनिधींकडे मागणी
उरण, ता. १ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील मैदानी खेळांना (क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, बॅडमिंटन, कबड्डी) कोरोना संसर्गामुळे बंदी आणली होती. या खेळाला परवानगी मिळावी, यासाठी विविध क्रीडा क्षेत्रातील संघटना आता लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन निवेदन देत आहेत. उरण, पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मैदानी खेळ सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे क्रीडा संघटना, क्रीडाप्रेमींकडून केली जात आहे.
पनवेल, उरण, पेण, अलिबाग, कर्जत, खालापूर, तसेच रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, बॅडमिंटन, कबड्डी आदी मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जातात. या खेळांच्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून हजारो नागरिकांना विविध प्रकारे रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र, कोरोनाच्या नियमामुळे मैदानी खेळावर बंदी आल्याने त्यावर अवलंबून राहणाऱ्या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे मैदानी खेळ हे स्वतःला फिट ठेवण्यासाठी, स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करत असतात. शिवाय, या खेळावर अनेक नागरिकांचे पोट भरत असल्याने मैदानी खेळावर, मैदानावर, विविध स्पर्धांवर कोरोनामुळे बंदी आणू नये. यासाठी विविध क्रीडा संघटना, संस्था, क्रीडा रसिकप्रेमी, चाहते यांनी बंदी उठवून मैदानी खेळ सुरू करावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे करत आहेत.
यासाठी विविध क्रीडा, संघटनांनी रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे, मावळ लोकसभा मतदारसंघांचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, आमदार महेंद्र थोरवे, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात उरण-पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मैदानी खेळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
उपासमारीची वेळ
खेळ खेळण्यासाठी लागणारे साहित्य, टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट, बॅट, बॉल आदी साहित्य बनवणारे अनेक कारखाने रायगड जिल्ह्यात आहेत. त्यातील शेकडो कामगार रोजंदारीवर काम करतात. मैदाने आणि खेळ बंद झाले, तर त्यांना उपजीविका करणे खूपच कठीण जाईल. साहित्याची विक्री करणारे अनेक दुकाने ओस पडतील. प्रत्येक दुकानात तीन ते चार माणसे असतात. अशी शेकडोंचे रोजगार बुडून उपासमारीची वेळ आली आहे. खेळाच्या आणि स्पर्धेच्या माध्यमातून समालोचक, पंच, गुणलेखक, अपडेटर, लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी अशा अनेक लोकांची कुटुंबे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या खेळावर अवलंबून आहेत. अगदी पाण्याच्या बॉटलपासून ते चायनीज गाडी, वडापाव, टपरी, चाय दुकान ढाबा यांचाही रोजगार या खेळ, स्पर्धांवर अवलंबून आहे.