वसई-विरारमध्ये पाचवी ते सातवीचे वर्ग आजपासून
वसई, ता. ३१ (बातमीदार) : वसई- विरार महापालिका क्षेत्रातील पाचवी ते सातवीच्या शाळा मंगळवारपासून (ता. १) सुरू कराव्यात, असा निर्णय आयुक्त अनिलकुमार पवार यांनी घेतला आहे. याबाबतचे आदेश त्यांनी काढले असून, पहिली ते चौथी इयत्तेच्या शाळाही ७ फेब्रुवारीपासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता व अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना शाळांना करावी लागणार आहे. तसेच प्रभाग अधिकारी, परिमंडळ अधिकारी याकरिता कार्यरत असणार आहेत.
पालिका हद्दीतील पहिली ते सातवीच्या शाळा यापूर्वी २७ जानेवारीला सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता; परंतु शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. दरम्यान, शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांची आवश्यकता असल्यास आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. तसेच शाळेत सॅनिटायझर, मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. शाळेमध्ये आरोग्य पथकदेखील येणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती घेणार आहे. त्याचबरोबर आरोग्याविषयी काही तक्रारी जाणवत असतील, तर त्याची माहिती शाळेच्या संस्था चालकांना व शिक्षकांना ठेवावी लागणार आहे.
----
पहिली ते पाचवी शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिका क्षेत्रात करण्यात आला आहे. शाळांनी कोरोनाबाबत आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे; तसेच गर्दी टाळावी. पहिली ते चौथी इयत्तेचे वर्ग ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, महापालिका