चोरलेल्या मोबाईलचे लोकेशन परराज्यांत
रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाकडून शोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : रेल्वे प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारतात. चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांद्वारे विशेष पथक तयार केले आहे. सदर मोबाईलचा शोध घेतला असता बहुतांश मोबाईल उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये असल्याचे आढळून आले आहे. २०१८ ते २०२१ या कालावधीत चोरीला गेलेल्या चार हजारांहून अधिक मोबाईल ट्रेस करण्यात आले, ते मोबाईल परत मिळवण्यासाठी रेल्वे पोलिस प्रयत्न करत आहेत.
रेल्वे प्रवासात किंवा रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे मोबाईल लंपास होण्याच्या घटना घडतात. चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने २०१८ ते २०२१ दरम्यान चोरीला गेलेल्या चार हजार १०३ मोबाईल शोधून काढले. यापैकी ८२२ मोबाईल महाराष्ट्रात, तर उर्वरित तीन हजार २८१ मोबाईल परराज्यांत असल्याचे ट्रेस झाले. चोरीचे सर्वाधिक एक हजार १०२ मोबाईल हे उत्तर प्रदेशमध्ये ट्रेस झाले असून त्यापाठोपाठ बिहारमध्ये ४४२ आणि पश्चिम बंगालमध्ये ४४१, कर्नाटकात २४२, गुजरातमध्ये २०५ आणि आंध्र प्रदेशात १८९, मध्य प्रदेशात १५० आणि राजस्थानमध्ये १०८ चोरीचे मोबाईल सापडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
------------------------------
राज्यनिहाय ट्रेस झालेले मोबाईल
उत्तर प्रदेश - ११०२
बिहार - ४४२
पश्चिम बंगाल - ४४१
महाराष्ट्र - ४२४
मुंबई - ३९८
कर्नाटक - २४२
गुजरात - २०५
आंध्र प्रदेश - १८९
तामिळनाडू - १७८
मध्य प्रदेश - १५०
राजस्थान - १०८