पाणीटंचाई रोखण्यासाठी विहीर सफाई
ठाणे महापालिकेकडून १२८ विहिरींची स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे शहरातील नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार हद्दीतील नैसर्गिक स्रोतांचा वापर करण्याचे निश्चित केले असून शहरातील विहिरींची साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत १२८ विहिरींची सफाई करण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
ठाणे महापालिकेने या वर्षी पाणीटंचाई भासू नये, याकरिता नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. याकरिता शहरातील उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा वापर करण्यात येणार आहे. त्यानुसार शहरातील विहिरीच्या पाण्याचा उपयोग इतर कामांसाठी वापरात आणण्याचे ठरवले. त्याकरिता या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू झाले. या कामाअंतर्गत आतापर्यंत १२८ विहिरींचा गाळ काढण्यात आला आहे. त्या विहिरी वापरात आणल्या गेल्या आहेत; तर उर्वरित विहिरींची साफसफाईची कामे लवकरच पूर्ण होतील, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
शहरात विविध भागांत ५५५ सार्वजनिक विहिरी आहेत; परंतु यातील काही विहिरी पडीक, वापरात नसणे, कचऱ्याने निर्माण झालेली दुर्गंधी, काही विहिरी कोरड्या, तर काहींमध्ये गटाराचे पाणी गेल्याने ४० टक्के भूगर्भजलातील पाणीसाठा विविध कारणांमुळे दूषित झाल्याची माहितीही पालिकेच्या सर्वेत समोर आली होती. त्यामुळे वापरात नसलेल्या विहिरींची संख्या ही २१६ वर गेली आहे. त्यामुळे सध्या वापरात असलेल्या विहिरींची संख्या ही ३३९ वर आली आहे. या विहिरीतील पाण्याचे साठ्याचे मोजमाप हे ८.७ दशलक्ष लिटर आहे. यातील १.८ दशलक्ष लिटर पाणी हे वापरास, पिण्यास अयोग्य असल्याचे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आले.
चौकट
कूपनलिकांचीही दुरुस्ती
विहिरींच्या जोडीला शहरात असलेल्या कूपनलिका दुरुस्त करण्याचे कामही युद्धपातळीवर हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरात आजच्या घडीला १ हजार ८११ सार्वजनिक कूपनलिका आहेत. त्यातील काही कूपनलिका या हातपंपासहीत आहे, त्यांच्या वापर झोपडपट्टी भागातील रहिवासी करीत आहेत; तर काही कूपनलिका विद्युत पंपासह असून त्यांचा वापर सार्वजनिक ठिकाणी केला जात आहे.
चौकट
सार्वजनिक विहिरी ५५५
वापरातील विहिरी ३३९
विनावापरातील विहिरी २१६
सार्वजनिक कूपनलिका १,८११