मुंबई
हार्बरवर एसी लोकची संख्या सर्वाधिक का?
साधारण लोकलच्या फेऱ्यांवर घाला का?
हार्बर रेल्वेवर एसी लोकलच्या १६ सेवांमुळे प्रवासी मेटाकुटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः हार्बर रेल्वेवर १५ जानेवारीपासून एसी (वातानुकूलित) लोकलच्या संख्येत वाढ करण्यात आल्याने प्रवाशांच्या सेवेतील सर्वसाधारण गाड्या हिरावून घेण्यात आल्याची भावना प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी/ पनवेल आणि वांद्रे/ गोरेगाव स्थानकांदरम्यान १२ ऐवजी आता १६ एसी लोकल चालवण्यात येत आहेत. या मार्गावर आधीच सर्वसाधारण लोकलच्या ६१४ फेऱ्या आहेत. त्यातील १६ फेऱ्या या एसी लोकलच्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेचा मोठा अपव्यय होत आहे. आधीच सर्वसाधारण लोकलच्या फेऱ्या कमी असताना हार्बरवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने कोणत्या सूत्राच्या आधारे घेतला, असा संतप्त सवाल प्रवासी करीत आहेत.
वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असलेल्या पश्चिम रेल्वेवर सर्वसाधारण लोकल फेऱ्यांची संख्या १,३७५ इतकी आहे. त्या तुलनेत एसी लोकल फेऱ्यांची संख्या १६ आहे. मध्य रेल्वेवर सर्वसाधारण लोकल फेऱ्यांची संख्या १,७७४ इतकी आहे; तर एसी लोकल फेऱ्यांची संख्या आठ आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या तुलनेत सर्वसाधारण लोकलची संख्या निम्मी असूनही तब्बल १६ एसी लोकल चालवल्या जात आहेत.
विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या ताफ्यातील पहिली एसी लोकल जानेवारी २०२० मध्ये सर्वप्रथम ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेल या स्थानकांदरम्यान सुरू करण्यात आली.
यासाठी प्रशासनाने सर्वसाधारण लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या. एसी लोकलच्या ज्यादा तिकीट दरामुळे प्रवाशांनी एसी लोकलकडे पाठ फिरवली. सर्वसाधारण लोकलच्या फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांच्या गर्दीत वाढ झाली आहे. जानेवारी २०२२ पासून सीएसएमटी ते वांद्रे/ गोरेगाव आणि वाशी/ पनवेल स्थानकांदरम्यान १२ एसी लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात आणखी चार एसी लोकल गाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा बराच वेळ रेल्वे प्रवासात खर्ची पडत आहे.
...
एसी लोकलच्या एका डब्यात साधारण एक किंवा दोन प्रवासी बसलेले दिसतात. या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार नसेल तर मग मध्य रेल्वे प्रशासन इतका खर्च का करीत आहे?
- गणेश लहूजी, सीवूडस् दारावे
...
सर्वाधिक मालवाहतूक करणारी रेल्वे म्हणून मध्य रेल्वेची आशियात ख्याती आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक सांभाळून उपनगरी रेल्वेगाड्या चालवल्या जातात. त्यामुळे या मार्गावरील उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक नेहमीच कोलमडलेले असते, परंतु मध्य रेल्वेचाच भाग असलेल्या हार्बर रेल्वेवर तसा कोणताच ताण नाही; तर मग लोकल उशिराचे कारण काय?
- दीपाली गवस, मालाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.