
सेनेच्या दणक्यानंतरही फेरीवाल्यांचे बस्तान
वसई, ता. २४ (बातमीदार) ः शिवसेनेने वसईमध्ये उड्डाणपुलाला घेराव घालत फेरीवाला मुक्त परिसर करा यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर पालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच फेरीवाल्यांनी पुन्हा या ठिकाणी बस्तान मांडले असून रस्ते पूर्णतः व्यापले गेले आहेत. यामुळे पूर्व पश्चिम जोडणारा पूल वाहतूक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आंदोलनालादेखील केराची टोपली दाखवली गेली असून पालिका फेरीवाल्यांना हटवण्यास अपयशी होत असल्याचे समोर आले आहे.
नालासोपारा परिसरातील तुळींज, गालानगर, ओसवाल नगरी, आचोळे मार्ग, सेंट्रल पार्क याठिकाणी फेरीवाले मुख्य रस्ते अडवत कपडे, भांडी, मोबाईल साहित्य, खेळणी यांसह विविध वस्तूंची विक्री करतात. यामुळे फुटपाथ व रस्ते अतिक्रमित होत आहेत. वाहने कोंडीत अडकतात. नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा नसते. तसेच व्यापारी दुकानांना देखील अडसर निर्माण होत असतो.
शिवसेनेने याविषयी आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते व्यापले गेल्याने वाहनांची कोंडी उड्डाणपूल, तुळींज, आचोळे मार्गावर रोजच होत असून अत्यावश्यक सेवांना याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आंदोलन थोपटण्यासाठी केवळ कारवाईचा सूर आवळला गेला का असा सवाल नागरिकांतून प्रशासनाला विचारला जात आहे.
------------
फेरीवाला रस्ते अतिक्रमणाबाबत आयुक्तांशी चर्चा करणार आहोत. पालिका कारवाई करण्यास सकारात्मक असून पोलिस बंदोबस्त मिळाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे समजते. वाहतूक कोंडी दूर होऊन रस्ते मोकळे व्हावेत हीच आमची मागणी आहे. जर योग्य कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन छेडू.
- शिरीष चव्हाण - माजी जिल्हाप्रमुख , शिवसेना.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..