
आरडीसीसी बँक शिक्षकांसाठी तारणहार
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने महाड आणि चिरनेर या शाखेमध्ये खाते असलेल्या शिक्षकांचे अपघाती निधन झाले असल्यास त्यांच्या कुटुंबीयांना अर्थसाह्य केले जाणार आहे. दि न्यू इंडिया इन्शुरन्सच्या सहकार्याने प्रत्येकी १५ लाखांचा धनादेश बँकेच्या केंद्र कार्यालयामध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप आपसुंदे; तसेच दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक अलका आगरकर, क्षेत्रीय व्यवस्थापक किशोर सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जयश्री शिवभगत (चिरनेर), अभय शिगवण (महाड) यांनी हा धनादेश अपघाती विमा योजनेअंतर्गत स्वीकारला आहे. बँकेच्या या सहकार्यामुळे आम्हाला आमच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी मदत होणार आहे. याबाबत आम्ही बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, बँकेचे सर्व संचालक आणि अधिकारी यांचे आभार मानतो, असे मत जयश्री शिवभगत आणि अभय शिगवण या लाभार्थींनी व्यक्त केले. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने २०२१ मध्ये ज्या खातेधारकांचा पगार बँकेच्या शाखेमध्ये जमा होतो, त्यांच्यासाठी ऐच्छिक स्वरूपाची योजना दि न्यू इंडिया इन्शुरन्सद्वारे सुरू केली आहे. या योजनेनुसार पगारदार खातेदार यांच्यासाठी १५ लाखांचा अपघाती विमा देण्यात आला आहे. बँकेच्या या अभिनव योजनेला जिल्ह्यातून पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद लाभला असून तब्बल ३ हजार ३८८ खातेधारकांनी या योजनेमध्ये सहभाग घेतला. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांची संख्या अधिक प्रमाणात होती. या वेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप आपसुंदे यांनीही बँकेचे कौतुक केले. दिवाळीच्या वेळी शिक्षकांचा पगार उशिरा आल्याने बँकेने त्यांना वेळीच अॅडव्हान्स उपलब्ध करून दिला होता, याचा उल्लेख करत प्रदीप आपसुंदे यांनी बँकेचे अभिनंदन केले.