वाकण-पाली-खोपोली मार्गावरील प्रवास निर्विघ्न

वाकण-पाली-खोपोली मार्गावरील प्रवास निर्विघ्न

Published on

पाली, ता. ३ (वार्ताहर) : वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सात वर्षांपासून सुरू होते. या मार्गावर भालगुल व जांभूळपाडा येथील नदीवरील दोन्ही बाजूच्या नवीन पुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर पाली अंबा नदीवरील एका पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाली व जांभूळपाडा अंबा नदी पुलावरून प्रवासी, विद्यार्थी व वाहनचालकांची होणारी गैरसोय या नवीन उंच व रुंद पुलांमुळे थांबणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात पाली व जांभुळपाडा अंबा नदी पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प होत होती. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी व वाहनचालकांची खूप गैरसोय व्हायची. पाली-खोपोली मार्ग सुस्थितीत व्हावा, येथील पूल नव्याने बांधण्यात यावेत, यासाठी वारंवार आंदोलने केली गेली. याच आंदोलनाची परिणीती आणि जनतेचा रेटा याला अखेर यश आले. पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात वाहतुकीचा खोळंबा होणार नाही.

महत्त्वाचा मार्ग
वाकण-पाली-खोपोली मार्गावरील हे तिन्ही पूल मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचा दुवा आहे. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक होते. वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग पुणे-मुंबईवरून खोपोलीमार्गे कोकणाकडे जाण्यासाठी वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर येथून विळेमार्गे पुणे आणि माणगावलाही जाता येते.

अधिक उंच, विस्तीर्ण व मजबूत पूल
२५ कोटींच्या निधीतून अधिक क्षमता, रुंदी आणि उंचीचे पूल तयार झाले आहेत. पाली, जांभुळपाडा व भालगुल येथे नव्याने होणारे पूल हे आधीच्या पुलांपेक्षा ५ ते ६ फूट उंच आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पुलावरून पाणी जाऊन वाहतूक खोळंबणार नाही. या पुलांची क्षमता तब्बल ७५ टन वजन सहन करण्याची असल्याने पुलाला बळकटी मिळणार आहे. याची रुंदी १६ मीटर असणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी अधिक वजनाची मोठी व छोटी वाहने सहज जाऊ शकणार आहेत.

भालगुल व जांभुळपाडा येथील दोन्ही पुलांचे काम पूर्ण झाले आहे. पाली अंबा नदीवरील एका पुलाचेही काम पूर्ण झाले आहे. या सर्व पुलांवरून वाहतूक सुरू झाली आहे. ऑगस्टमध्ये येथील जुना पूल तोडून त्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू करण्यात येईल. साधारण डिसेंबरपर्यंत दुसरा नवीन पूलही पूर्ण होईल. सद्यस्थितीत पावसाळ्यात या तीनही नदीच्या पुलावरून पाणी न गेल्याने वाहतूक सुरळीत सुरू आहे.
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी


पाली : अंबा नदी नवीन पुलाचे काम पूर्णत्वास आल्याने वाहतूक सुरळीत सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.