‘त्या’ काळरात्रीने अंगावर शहारा

‘त्या’ काळरात्रीने अंगावर शहारा

Published on

‘त्या’ काळरात्रीच्या आठवणींनी शहारा
१९८९ च्या जांभुळपाड्यातील महापुराला ३६ वर्षे पूर्ण
अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २४ ः सुधागड तालुक्यातील अंबा नदीला २३ जुलै १९८९ रोजीच्या मध्यरात्री महापूर आला होता. या महापुरामुळे जांभुळपाडा परिसरातील ८० ग्रामस्थांनी जीव गमावला होता. ‘त्या’ काळरात्रीच्या आठवणींना गुरुवारी ३६ वर्षे पूर्ण झाली. या वेळी महापुरात गतप्राण झालेल्या आप्तेष्ठांच्या आठवणींनी ग्रामस्थांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
एका रात्रीत महाप्रलयाचे तांडव किती भयानक असू शकते, याचा प्रत्यय ३६ वर्षांपूर्वी सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा या गावातील ग्रामस्थांनी अनुभवला आहे. आजही ही घटना आठवली तरी अंगावर शहारे येतात. या पुरात अनेकांनी जिव्हाळ्याची माणसे गमावली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सरकार दरबारी मृतांचा आकडा ८० असला तरी वास्तवात शेकडो लोकांनी जीव गमावला होता. या पुराचा फटका पालीसह इतर गावांना बसला. मन सुन्न करणाऱ्या अशा आठवणी आजही जांभुळपाडा गावातील ग्रामस्थांजवळ आहेत. कोणी जीव वाचविण्यात तर कोणी इतरांचे जीव वाचविण्यासाठी पुढे आले होते.
--------------------------------------------------
...अन् ती डोळ्यासमोर वाहून गेली
त्या काळरात्रीने माझी कारभारीन हिरावून नेली. २३ तारखेला संध्याकाळी मुंबईवरून बायकोच्या माहेरून सर्वजण घरी आलो. नदीला तसे पाणी जास्त नव्हते. रात्री अडीच वाजता उठून बघतो तर काय सर्व घरात पाच फूट पाणी. आई, भाची (पाचवीत), मुलगा (अडीच वर्षांचा) आणि बायको सगळे गोंधळून गेलो. बायकोचा हात हातातून निसटाला आणि ती डोळ्यासमोरून वाहून गेली. आई, भाची स्वयंपाक खोलीच्या ओट्याच्या खिडकीला टांगून राहिल्या म्हणून वाचल्या, पण कारभारणीबरोबर तिच्या पोटातील आठ महिन्यांचे बाळ वाहून गेल्याचे सांगताना घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार जे. बी. पाटील गहिवरून गेले.
----------------------------
सारे काही क्षणात उद्ध्वस्त
- एका रात्रीत संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले. रस्ते, मंदिरे, शाळा, घरे सगळ गाव जमिनदोस्त झाले. अनेक ठिकाणी प्रेत अडकलेले व लटकलेली होती. सगळीकडे सुन्न आणि भयावह वातावरण होते. निसर्गाचा कोप होऊन आभाळ फाटणे काय असत याचा खराखुरा प्रत्यय या पुराने लोकांना बघायला लावला.
- नेस्तनाबूत झालेल्या या जांभुळपाडा गावाला चारही बाजूने मदतीचा ओघ सुरू झाला. शासकीय मदतही विनाविलंब मिळायला लागली. स्थानिक मंडळींनी शाळेत जमा करून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य युद्ध पातळीवर केले. पाच ते सात वर्षांच्या कालखंडात अनेक विधायक कामांमुळे जांभुळपाडा गाव पुन्हा उभे राहिले.
----------------------------
पाली ः जांभुळपाडा महापुरातील मृतांना श्रद्धांजली वाहताना ग्रामस्थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com