रायगडमधील २१ धरणे भरली

रायगडमधील २१ धरणे भरली
Published on

रायगडमधील २१ धरणे भरली
पाणीटंचाई कमी होण्यासाठी उपयोगी; उपयुक्त जलसाठा ९०.६१ टक्क्यांवर
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ : जिल्ह्यात यंदाच्या पावसाने अक्षरशः जलक्रांती घडवून आणली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील २८ धरणांपैकी तब्बल २१ धरणे तुडुंब भरली असून, जिल्ह्यातील एकूण उपयुक्त जलसाठा ९०.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या अनेक गावांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची घडामोड ठरली आहे.
यंदा पाणीटंचाईची झळ जुलै महिना सुरू होईपर्यंत जाणवत होती. साधारण एक लाख ६० हजार नागरिक या टंचाईत होरपळून निघाले होते. सध्या पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील २१ लघुपाटबंधारे भरली असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गणेशोत्सवादरम्यानही पावसाचे सातत्य कायम असल्यामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची भर घातली. परिणामी, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे, अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येत होती, मात्र यंदा धरणांतील मुबलक जलसाठ्यामुळे अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी झाली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा
लघुपाटबंधारे विभागाची धरणे केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे, तर लघु सिंचन योजना, शेतीसाठी पाणीपुरवठा आणि भूजल पुनर्भरणासाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे धरणे भरल्याने शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. सिंचनासाठी आवश्यक पाण्याचे नियोजन अधिक सक्षमपणे करता येणार असून, कृषी उत्पादन वाढीसाठीही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

जलस्रोतांची पातळी वाढणार
याशिवाय धरणांतील वाढलेल्या जलसाठ्यामुळे विहिरी, कूपनलिका आणि इतर स्थानिक जलस्रोतांची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना दीर्घकालीन लाभ मिळणार आहे. सध्या उपलब्ध असलेला ९०.६१ टक्के जलसाठा प्रशासनासाठीही मोठी ताकद ठरणार असून, पाणी व्यवस्थापन आणि नियोजन अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे.

२८ पैकी २१ धरणे तुडुंब
लघुपाटबंधारे विभागाच्या २८ धरणांपैकी फणसाड, वावा, सुतारवाडी, आंबेघर, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, कुडकी, पाभरे, संदेरी, वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, भिलवले, कलोते-मोकाशी, डोणवत, मोरबे आणि बामणोली ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. उर्वरित सात धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास तीही लवकरच भरतील, अशी शक्यता आहे.

सरासरी ९३.०८ टक्के पावसाची नोंद
जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा १७३.९ टक्के पाऊस झाला. त्यानंतर पावसाने थोडी उसंत घेतली होती. १५ सप्टेंबरपर्यंत वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या ९३.०८ टक्के पाऊस आतापर्यंत नोंदविण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने धरणांमधील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com