विद्यापीठ परीक्षा आणि निकालावरून अधिकारी धारेवर

विद्यापीठ परीक्षा आणि निकालावरून अधिकारी धारेवर

Published on

मुंबई, ता. ६ : राज्य विद्यापीठ कायदा एक असताना राज्यातील अकृषी विद्यापीठातील परीक्षा आणि त्याचे नियोजन वेगळे असते. त्यामुळे काही अपवाद वगळता सर्वच विद्यापीठांत परीक्षा आणि निकालाचा गोंधळ असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागतो. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आणि निकाल याचा आढावा घेतला. अनेक विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार होत नसल्याने त्यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली, तर काहींचे स्वागतही केले.

मंत्रालयात चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील परीक्षा आणि निकालाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त महेंद्र वारभुवन, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाटील यांनी विद्यापीठांनी किमान विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन आता तरी आपल्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत यासाठी विद्यापीठांना सूचना केल्या आहेत.
पाटील पुढे म्हणाले, की राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत संभाव्य वेळापत्रक जाहीर केलेले असते. त्यानुसार विद्यार्थी प्रवेशाचे नियोजन करतात. म्हणून पदवी परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर होणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि त्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी सर्व अकृषी विद्यापीठाने विद्यार्थी हितासाठी वेळेत निकाल जाहीर होतील याचे नियोजन करून पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करावे, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या.

दिरंगाई चालणार नाही!
मागील एक महिन्यापूर्वी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी मुंबई विद्यापीठातील परीक्षा आणि निकालावर नाराजी व्यक्त करत त्यासाठी सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते; मात्र त्यानंतरही विद्यापीठात काही अपवाद वगळता सुधारणा होऊ शकल्या नसल्याचे चित्र आहे. तीच स्थिती इतर विद्यापीठात असल्याने चंद्रकांत पाटील यांनी आज राज्याच्या विद्यापीठाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अडचणी येऊ नयेत यासाठी सर्व अकृषी विद्यापीठांनी परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर होणे आवश्यक असून त्यासाठी आता दिरंगाई चालणार नाही, असा इशारा त्यांनी बैठकीत दिला असल्याचे अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.