तीन वर्षानंतरही पदवीसह बाहेर पडण्याचा मार्ग

तीन वर्षानंतरही पदवीसह बाहेर पडण्याचा मार्ग

Published on

तीन वर्षांनंतरही पदवीसह बाहेर पडण्याचा मार्ग
आयआयटी मुंबईने दिला पर्याय
मुंबई, ता. २६ ः नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवीचे सर्व शिक्षण हे चार वर्षांचे होणार आहे. मात्र आयआयटी मुंबईने या धोरणाची अंमलबजावणी करत बी.एस्सीच्या पदवीची तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवीसह बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना चार वर्षांची पदवी पूर्ण करता येऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना हा पर्याय देण्यात आला आहे. मागील वर्षीच प्रायोगिक तत्त्वावर हा तीन वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्याय दिला होता, त्याला सुमारे १५ विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत पर्याय निवडला होता. या पर्यायाला यंदा अधिक प्रतिसाद मिळणार असल्याची माहिती आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्रोफेसर एस. सुदर्शन यांनी दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची तीन वर्षे साजरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबई, केंद्रीय विद्यालय संघटन आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एस. सुदर्शन यांनी ही माहिती दिली.
एस. सुदर्शन यांनी लवचिकता हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा अविभाज्य घटक असल्‍याचे सांगितले. लवचिकता हे कोणत्याही यशस्वी शिक्षण व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे आणि ते एक उत्तम व्यक्तिमत्त्व घडवते, असे ते म्हणाले. तसेच आयआयटी मुंबईमध्ये निवडक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना लवचिकता देतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. लवचिकतेव्यतिरिक्त, एनईपीने पारंपरिक मार्गांच्या पलीकडे जाऊन नवीन विषयांना आयआयटीमध्ये प्रोत्साहन दिले आहे. व्यवस्थापन आणि उद्योजकतेसंबंधित स्कूल ऑफ मॅनेजमेंट, स्कूल फॉर आंत्रप्रेन्योरशिप आणि इतर यांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
चार वर्षांची पदवी पूर्ण करण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी असलेल्या पर्यायांवर प्रा. महाजन म्हणाले, बीएस्सी पदवी मिळविण्यासाठी, विद्यार्थ्यांना तीन वर्षांच्या कालावधीत १६० क्रेडिट्स पूर्ण करणे आवश्यक आहे. कोणत्याही विद्यार्थ्याने मुख्य विषयात किमान ३० क्रेडिट्स पूर्ण केल्यास त्यांना त्या विषयातील विशेष पदवी मिळेल. एक्झिट स्कोअरसाठी पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्याने एकूण १६० क्रेडिट्स मिळविल्या असतील तर त्यापैकी ३० कॉम्प्युटर सायन्सचे असतील. त्‍यामुळे विद्यार्थ्याला कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएस्सीची पदवी मिळेल, अशी माहिती प्रा. महाजन यांनी दिली. यावेळी केंद्रीय विद्यालय संघटनेच्या उपायुक्त सोना सेठ, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सहसंचालक केतन पटेल, आयआयटीतील शैक्षणिक कार्यक्रमाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश महाजन आदी उपस्थित होते.
--
केंद्रीय विद्यालयात पूर्व प्राथमिकसाठी बालवाटिका वर्ग
एनईपीची अंमलबजावणी ही केंद्रीय विद्यालयांच्या शाळांमध्ये सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर बालवाटिका (पूर्व-प्राथमिक वर्ग) हे सत्र २०२२-२३ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. त्‍याला कायमस्वरूपी इमारती मिळाल्या आहेत. यंदा बालवाटिकेच्या तिन्ही वर्गांमध्ये ५ हजार ४७७ मुले दाखल झाली आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात राज्यभरात २० नवीन बालवाटिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय विद्यालय संघटनेच्या उपायुक्त सोना शेठ यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.