ईशान्य मुंबईत डम्पिंग ग्राउंड चा विषय तापला ,

ईशान्य मुंबईत डम्पिंग ग्राउंड चा विषय तापला ,

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : शेवटच्या टप्प्यात मुंबईत मतदान होणार असून महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगणार आहे. यानिमित्ताने विविध मुद्दे प्रचारात येत असतानाच उत्तर-पूर्व (ईशान्य) मुंबई मतदारसंघात डम्पिंग ग्राऊंडचा मुद्दा गाजत असून त्यावरून दोन्हीकडील उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने वातावरण तापले आहे. महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी डम्पिंग ग्राऊंडच्या प्रश्‍नासाठी सर्वस्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्याला उत्तर देताना केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही भाजपने डम्पिंग ग्राऊंड का हटवले नाही, असा पलटवार महाविकास आघाडीने केला आहे.
भांडुप, नाहूर, कांजुरमार्ग, विक्रोळी येथे शिवसेनेने (ठाकरे गट) डम्पिंग ग्राऊंड गिफ्ट दिले आहेत. हा लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे, असा आरोप उमेदवार आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. शिवसेनेचे दत्ता दळवी महापौर असताना त्यांनी डम्पिंगच्या प्रस्तावाला विरोध न करता बिनशर्त मंजुरी दिली. प्रत्यक्षात नाहूर, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी येथे बहुसंख्य मराठी लोकवस्ती आहे. या भागातून शिवसेनेचे आमदार, नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येतात. तरीही शिवसेनेने येथील मराठी लोकांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेऊन डम्पिंगला विरोध का केला नाही, असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले की, देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडचा करार २०२५ पर्यंत आहे. या कराराला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळवून देणार नाही. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रश्‍न सोडवला जाईल. उत्तर-पूर्व मुंबई डम्पिंगमुक्त करणार, असा निर्धार कोटेचा यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी कोटेचा यांच्या आरोपांचे खंडन करून डम्पिंग ग्राऊंडविरोधातील लढा शिवसेनेनेच सुरू केला आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरवण्याचा शिवसेनेने कायम प्रयत्न केला आहे. आरोप करणारे आमच्याकडे बोट दाखवत आहेत. मात्र, राज्यात आणि पालिकेमध्ये ते अनेक वर्षे सत्तेत होते. मग डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचा त्यांनी का प्रयत्न केला नाही, लोकांना होणारा त्रास त्यांना दिसला नाही का, असा सवालही त्यांनी केला.
मुंबईत बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना ईशान्य मुंबईत होणाऱ्या पीएपी प्रकल्पात पुनर्वसन करण्याचा घाट महायुतीच्या सरकारने घातला आहे, असा आरोप संजय दिना पाटील यांनी केला.
-----
ही बाब का लपवली!
धारावी पुनर्वसनासाठी मुलुंडमधील जकातनाक्याची १८ एकर व त्या बाजूची ४६ एकर जागा महापालिकेच्या मालकीची आहे. राज्य सरकारने धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मुंबई पालिकेकडे पत्राद्वारे जागा मागितली आहे. त्यापैकी जकातनाक्याची १८ एकर जागा राज्य सरकारला देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबाबत मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. मात्र, ही बाब किरीट सोमय्या यांनी मतदारांपासून लपवून ठेवली. केंद्र सरकारकडे राज्य सरकारने मिठागरांची जागा देण्याची मागणी केली आहे. सोमय्या मिठागरांच्या जागेवर होणाऱ्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबतही काहीही बोलत नाहीत. यामागे गौडबंगाल काय आहे, असा सवाल संजय पाटील यांनी केला आहे.
..................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com