स्वजातीने नाकारल्याने ‘डिपॉझिट’ जप्त

स्वजातीने नाकारल्याने ‘डिपॉझिट’ जप्त

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ताकद दाखवण्याची संधी ओबीसी नेत्यांकडे चालून आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत धनगर, बंजारा, माळी आदी ओबीसी समाजातील नेत्यांची राजकीय वाताहत झाली आहे. एकाही मोठ्या नेत्याला पक्ष-संघटनांच्या बॅनरखाली निवडून येता आले नाही. त्यामुळे ओबीसी मतदारांनीच नाकारल्याने अनेकांचे ‘डिपॉझिट’जप्त झाले आहे.
राज्यात ओबीसींच्या विविध संघटनांच्या नावाखाली पक्ष, संघटना चालवणाऱ्या नेत्यांमध्ये हरिभाऊ राठोड, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, प्रदीप ढोबळे, राजाराम पाटील, लक्ष्मण हाके, कृष्ण फुलकारी, धनाजी गुरव आदी नेत्यांना ओबीसी मतदारांनी सपशेल नाकारल्याने अनेकांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे. अनेक जण स्वजातीची मतेही खेचू शकले नाहीत, त्यामुळे सर्वांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. धनगरांचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा पराभव झाला. परभणी जिल्ह्यात पाच लाख धनगर मतदार असतानाही तब्बल एक लाख ३४ हजार मतांनी झालेला पराभव चिंताजनक आहे. ओबीसी बहुजन पार्टी स्थापन केलेले धनगर नेते प्रकाश शेंडगे यांना तर सांगलीतून ८ हजार २५१ मते मिळाली. एकीकडे धनगर समाजाने, तर दुसरीकडे ओबीसी मतदारांनीही या नेत्यांना सपशेल नाकारले. अशीच स्थिती गेल्या निवडणुकीत दीड लाखांहून अधिक मते घेणाऱ्या कुणबी समाजाचे नेते राजाराम पाटील यांची झाली. मावळमधून बसपाकडून लढणाऱ्या पाटील यांना अवघी ४ हजार मते मिळाली. जातनिहाय जनगणनेच्या मुद्यामुळे सर्व मतदारांचा सूर महाविकास आघाडीकडे जाण्याचा होता.
------------------------
मतदारांनी सपशेल नाकारले
ओबीसी सेवा संघाचे नेते प्रदीप ढोबळे यांना भंडारा-गोंदियातून १ हजार १९६ मतांपेक्षा अधिक मते मिळवता आली नाहीत; तर प्राध्यापक श्रावण देवरे यांनी वेगळी चूल मांडूनही उपयोग झाला नाही. ओबीसी आणि इतर घटकांतील २५ संघटनांना एकत्र केलेल्या ओबीसी एनटी पार्टी संजय कोकरे यांच्या पक्षालाही यश आले नाही. बंजारा, धनगर, भटके विमुक्त आणि एकूणच ओबीसी समाजातील नेत्यांना मतदारांनी सपशेल नाकारले.
----------------------------
लोकसभ‍ा निवडणुकीत ओबीसी आरक्षण हे खूप महत्त्वाचे मुद्दे होते; परंतु आम्हाला मुद्दे हाताळता आले नाहीत. प्रस्थापित राजकीय शक्तींच्या विरोधात आमचा हा लढा होता. ही फक्त सुरुवात आहे. विधानसभा निवडणुकीत कामगिरी सुधारता येईल.
- मच्छिंद्र भोसले, राष्ट्रीय प्रवक्ते, ओबीसी बहुजन पार्टी
----------------------------
अपयशाची कारणे
- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा नीट रेटता आला नाही.
- अनेक नेते एकमेकांविरुद्ध लढले.
- धनगर समाज आघाडीकडे गेला.
- कुणबी, माळी मते खेचण्यात नेतृत्व कमी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com