

चार वर्षांत जलजन्य आजारांमध्ये वाढ
वर्षभरात १५ जणांचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत जलजन्य आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी सर्वात वाईट परिस्थिती दिसून आली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या वर्षी एकूण ३,९९१ जणांना जलजन्य आजारांची लागण झाली होती, तर १५ जणांना आपला जीव गमवावा लागला.
या आकडेवारीवरून दररोज ११ रुग्ण आजारी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत डॉक्टरांचे म्हणणे आहे की, दीर्घकाळ पडणारा पाऊस, अस्वच्छता आणि पिण्याच्या पाण्यातील अशुद्धता हे जलजन्य आजार वाढण्यास कारणीभूत आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, मागील वर्षाच्या तुलनेत जलजन्य आजारांची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. २०२१मध्ये जलजन्य आजारांची १,६२२, २०२२ मध्ये ३,७९२ आणि २०२३ मध्ये १,२९३ प्रकरणे आढळून आली. या वर्षी या संख्येत वाढ झाली असून, डायरियाच्या १,४७५ रुग्णांची नोंद झाली आहे, तर सहा जणांचा मृत्यू झाला. कॉलराच्या १,०२८ रुग्णांपैकी चार जणांचा मृत्यू झाला. गॅस्ट्रोच्या ६६९ रुग्णांपैकी चार जणांचा मृत्यू झाला. तसेच काविळीच्या ८२० रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
बॅक्टेरिया पाण्यात वाढतो
आरोग्य अधिकारी ग्रामीण भागांना विशेषतः असुरक्षित मानतात. कारण ते उघड्या विहिरी आणि पाण्याच्या स्त्रोतांवर अवलंबून असतात. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ग्रामीण भागात पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि उघड्या विहिरी दूषित होतात. या विहिरींची नियमित स्वच्छता न केल्यास घाण, कीटक, जीवाणू यांसारखे बॅक्टेरिया पाण्यात मिसळून रोगराई पसरते. या वर्षी प्रदीर्घ आणि तीव्र पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करणे कठीण झाले.
डॉक्टरांच्या मते शहरी भागही या संकटापासून अस्पर्शित राहिलेला नाही. बरेच रहिवासी विशेषत: स्थलांतरित रस्त्याकडेला असलेल्या पदार्थांवर आणि अन्नविक्रेत्यांवर अवलंबून असतात. ते अशा रोगांना प्रोत्साहन देतात. अशा स्थितीत महापालिकेने पाण्याची चाचणी करण्यासाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या अन्न व पाण्याच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी सातत्याने पावले उचलण्याची गरज आहे. सरकारी आरोग्य तज्ज्ञही जलसुरक्षा व्यवस्थापनातील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.