वाढत्या उष्णतेवर ठोस उपाय हवेत

वाढत्या उष्णतेवर ठोस उपाय हवेत
Published on

वाढत्या उष्णतेवर ठोस उपाय हवेत
मुंबईसह नऊ शहरांचा अभ्यास; मृत्यू वाढण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबोरेटिव्ह या नवी दिल्लीस्थित संशोधन संस्थेने ‘जागतिक तापमानवाढ आणि भारत करत असलेल्या उपाययोजना’ यावर देशातील नऊ शहरांचा अभ्यास केला. त्यात वाढत्या उष्णतेवर ठोस उपाययोजना हव्या असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या अहवालात मुंबईसह भारतातील नऊ प्रमुख शहरे उष्णतेच्या वाढत्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी कशा प्रकारे तयारी करत आहेत, याचा अभ्यास करण्यात आला आहे. भारताच्या शहरी लोकसंख्येच्या ११ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या मुंबई, बंगळूर, दिल्ली, फरीदाबाद, ग्वाल्हेर, कोटा, लुधियाना, मेरठ आणि सुरत या नऊ शहरांमध्ये राहते. या लोकसंख्येला भविष्यातील उष्मावाढीपासून सर्वाधिक धोका आहे. अहवालात नोंदवण्यात आलेल्या निष्कर्षानुसार, सर्व नऊ शहरे उष्णतेच्या लाटांवर तत्काळ उपाययोजना करण्यावर लक्ष केंद्रित करत असली तरी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट करतो. जेथे असे दीर्घकालीन उपाय अस्तित्वात आहेत, तेथे त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. प्रभावी दीर्घकालीन नियोजन न केल्यास भविष्यात वारंवार येणाऱ्या तीव्र आणि दीर्घ कालावधीच्या उष्णतेच्या लाटांमुळे भारतात उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढू शकते, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. नऊ शहरांमध्ये उष्णताविषयक उपाययोजना अमलात आणण्यासाठी जबाबदार असलेल्या शहर, जिल्हा आणि राज्य पातळीवरील प्रशासनात सहभागी अधिकाऱ्यांच्या ८८ मुलाखती घेतल्या. उष्णता अनुकूलनासाठी विविध क्षेत्रांतून समन्वित प्रतिसाद आवश्यक असल्याने आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, शहर नियोजन, कामगार विभाग यासह शहर आणि जिल्हा प्रशासकांच्या प्रतिनिधींच्या मुलाखती घेण्यात आल्या.
...
ठळक निष्कर्ष
- सर्व शहरांत अल्पकालीन स्वरूपाच्या आपत्कालीन उपाययोजनांची नोंद
- अल्पकालीन प्रतिसाद उपाययोजनेमध्ये मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्देश यांचा कमकुवत परिणाम दिसून येतो.
- अनेक महत्त्वाच्या दीर्घकालीन उपाययोजना उपलब्ध नाहीत
- दीर्घकालीन उपाययोजना मुख्यतः आरोग्य व्यवस्थेवर केंद्रित असतात
- अल्पकालीन उपाययोजना कमी खर्चिक असतात
- दीर्घकालीन हवामान अनुकूलनाकडे जाण्यासाठी अधिक निधीची आवश्यकता
- संस्थात्मक अडचणी दीर्घकालीन कार्यवाहीच्या शक्यता मर्यादित करतात
...
अहवालातील शिफारसी
- स्थानिक प्रशासनामध्ये उष्णता कृती योजना बळकट करा
- भारतातील सर्वांत जास्त उष्णता-संवेदनशील शहरांसाठी विशेष कार्यक्रम तयार करा
- जिल्हा पातळीवर प्रशिक्षित आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक कर्मचाऱ्यांची व्यवस्था करा
- सक्रिय शीतकरण कार्यक्रम तयार करा
- कागदोपत्री असलेल्या उष्णताविषयक उपाययोजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी हवामान अंदाज वापरा
...
जागतिक सरासरी तापमानात वाढ होत असताना याचा सामना करण्यासाठी आपण सज्ज होणे अत्यावश्यक आहे. उष्णतेचा सामना करण्यासाठी पूर्वनियोजित, दीर्घकालीन धोरणे या प्रयत्नांचे केंद्रबिंदू आहेत.
- लुकास वर्गास झेपेटेलो, सहाय्यक प्राध्यापक, कॅलिफोर्निया विद्यापीठ
...
अतिउष्णता आणि त्याचबरोबर उद्भवणाऱ्या आर्द्रतेच्या संपर्कात आल्याने जीवन आणि उपजीविकेला धोका निर्माण होतो. जागतिक तापमान वाढत राहिल्याने ही परिस्थिती आणखी बिघडत जाईल. यावर मात करण्यासाठी दीर्घकालीन आणि माहितीपूर्ण नियोजनाकडे वळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- अलेक्झांड्रा कॅसिनिस, अभ्यासक, हार्वर्ड विद्यापीठ
...
भारताच्या दाराशी येऊन ठेपलेल्या या समस्यांचा सामना करण्यासाठी भारत तयार नसल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून निघतो. यावर मात करण्यासाठी दीर्घकालीन अनुकूलता प्रयत्न करताना महत्त्वाचे साधन म्हणून या योजना महत्त्वाच्या आहेत.
- तमन्ना दलाल, रिसर्च असोसिएट, सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबोरेटिव्ह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com