मुंबईत दररोज सरासरी ९ कोविड रुग्णांची नोंद

मुंबईत दररोज सरासरी ९ कोविड रुग्णांची नोंद

Published on

मुंबईत दररोज सरासरी नऊ कोविड रुग्णांची नोंद
सावधगिरीची गरज; ‘आयएमए’चा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईत मेच्या सुरुवातीपासूनच कोविड प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत दररोज सरासरी नऊ जणांना कोविडची लागण होत आहे. मुंबईसह देशातील अनेक राज्यांमध्ये कोविडच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन, डॉक्टरांची सर्वांत मोठी संघटना असलेल्या इंडियन मेडिकल कौन्सिल (आयएमए)ने कोविडला घाबरून जाण्याऐवजी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीपासून राज्यात एकूण ३०० जणांना कोविडची लागण झाली आहे, त्यापैकी तब्बल २४८ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मेमध्ये २४२ जणांना कोविडची लागण झाली आहे.
कोविडच्या वाढत्या घटनांवर, राष्ट्रीय आयएमए कोविड टास्क फोर्सचे सहअध्यक्ष डॉ. राजीव विजयदेवन यांनी सांगितले, की कोविड हळूहळू परत येत आहे; परंतु २०२० किंवा २०२१मधली परिस्थिती नाही. कोविड आता वार्षिक चक्रात येत राहील, म्हणजेच त्याचे नवीन रूप दर काही महिन्यांनी दिसू शकते, जेव्हा विषाणू त्याचे जीन्स बदलतो आणि कालांतराने लोकांची समूह प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते; तेव्हा त्यांना संसर्ग होतो, जेव्हा विषाणूची लागण होते, तेव्हा शरीर प्रतिसाद देते; परंतु काही काळानंतर ती प्रतिक्रियादेखील सामान्य होते. या काळात जर विषाणू बदलला तर जुनी प्रतिकारशक्ती तितकी प्रभावी राहत नाही आणि लोकांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो.


प्रतिजैविकांचा वापर करू नका!
राष्ट्रीय आयएमए कोविड टास्क फोर्सचे सहअध्यक्ष डॉ. राजीव विजयदेवन यांनी सांगितले, की कोविडची लक्षणे खूपच सौम्य आहेत. ताप, सर्दी, सौम्य थकवा इ. बहुतेक लोक कोणत्याही विशेष उपचाराशिवाय तीन ते चार दिवसांत बरे होतात. यामध्ये रुग्णांनी अँटीबायोटिक्सचा (प्रतिजैविक) वापर अजिबात करू नये, कारण ते विषाणूंविरुद्ध प्रभावी नाहीत.


मृत्यूची प्रकरणे आणि सहव्याधी आजार
महाराष्ट्रात आतापर्यंत चार कोविड मृत्यूची नोंद झाली आहे, ज्याबद्दल डॉ. राजीव म्हणाले, की सर्व रुग्ण आधीच कर्करोग, मूत्रपिंडाचा आजार किंवा मधुमेहासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होते, अशा रुग्णांमध्ये कोणताही किरकोळ आजार त्यांच्यासाठी गंभीर ठरू शकतो; परंतु याचा अर्थ असा नाही की कोविड अजूनही प्राणघातक आहे. फ्ल्यूच्या लसी कोविडपासून संरक्षण देणार नाहीत; परंतु इन्फ्लूएंझा रोखण्यास निश्चितच मदत करतील.


..................
या गोष्टी लक्षात ठेवा
- घाबरू नका, सौम्य लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- प्रतिजैविके स्वतः घेऊ नका.
- फ्ल्यूची लस घेणे फायदेशीर आहे; परंतु कोविडपासून संरक्षण देत नाही.
- वृद्ध आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.
- प्रत्येक तापासाठी कोविड चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com