अतिधोकादायक सेस इमारतींचे वीज, पाणी तोडणार

अतिधोकादायक सेस इमारतींचे वीज, पाणी तोडणार

Published on

अतिधोकादायक सेस इमारतींचे वीज, पाणी तोडणार
रहिवाशांच्या सुरक्षेसाठी म्हाडा ॲक्शन मोडवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : म्हाडाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये मुंबई शहरातील ९६ उपकरप्राप्त (सेस) इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले आहे. जीर्ण झालेल्या या इमारती पावसामुळे कोसळून जीवितहानी होऊ नये, यासाठी म्हाडा ॲक्शन मोडवर आली आहे. त्यानुसार संबंधित सर्व अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. तसेच महिनाअखेरपर्यंत या इमारती रिकाम्या न केल्यास त्यांचे वीज, पाणी तोडले जाणार आहे.
मुंबईत शहरात सध्या आठ-दहा दशकांपूर्वी उभारलेल्या १३ हजारांहून अधिक उपकरप्राप्त इमारती आहेत. यापैकी अनेक इमारती जुन्या झाल्याने मोडकळीस आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात या इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. तसेच अतिधोकादायक इमारतीमधील रहिवासी, भाडेकरूंचे संक्रमण शिबिरात स्थलांतर केले जाते. त्यानुसार म्हाडाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ९६ इमारती अतिधोकादायक आढळल्या असून, त्यामध्ये २,५७७ निवासी आणि ५८५ अनिवासी असे एकूण ३,१६२ रहिवासी आहेत. या इमारती रिकाम्या न केल्यास जीवितहानी होण्याचा धोका असल्याने म्हाडाने संबंधितांना नोटीस देत इमारतीच्या दर्शनी भागात लावत इमारती, सदनिका रिकाम्या करण्यास बजावले आहे. त्यानुसार संबंधितांनी इमारती रिकाम्या करण्यास नकार दिल्यास महापालिका आणि बेस्टच्या माध्यमातून पाणी आणि वीज कापली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुरावे सादर करावे लागणार
म्हाडाने अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याबाबत संबंधित रहिवासीस, भाडेकरूंना नोटिसा दिल्या आहेत. त्यांनी या नोटीस, त्यांच्याकडे घराची असलेली कागदपत्रे आदी बाबी म्हाडाच्या विभागनिहाय असलेल्या कार्यकारी अभियंत्यांकडे सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर त्यांना संक्रमण शिबिरात सदनिका किंवा भाडे देण्याची कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

भाड्याचा पर्याय
अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या उपकरप्राप्त इमारती रहिवाशांना रिकाम्या करण्याबाबत म्हाडाने नोटिसा दिल्या आहेत. त्यानुसार त्यांना संक्रमण शिबिरात तत्पुरत्या स्वरूपात गाळा उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र रहिवासी संक्रमण शिबिरात जाण्यास इच्छुक नसल्‍यास त्यांना महिन्याला २० हजार रुपये भाड्याचा पर्याय खुला असणार आहे. संबंधितांनी अतिधोकादायक इमारतीमधील सदनिका रिकामी केल्यानंतर त्याने व्हेकेशन नोटीस, घराचे पुरावे दिल्यानंतर तत्काळ प्रभावाने भाडे सुरू केले जाणार आहे. हे भाडे बँक खात्यात दर महिन्याला जमा केले जाणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी लवकर आपल्या इमारती रिकाम्या कराव्यात, असे आवाहन म्हाडाने केले आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अतिधोकादायक आढळलेल्या इमारती रिकाम्या करण्याबाबत रहिवाशांना नोटिसा दिल्या आहेत. तसेच म्हाडाने त्यांना संक्रमण शिबिर किंवा भाड्याचा पर्याय दिला आहे. त्यानंतरही इमारती रिकामी केल्या जाणार नसतील तर वीज, पाणी तोडण्याची कारवाई केली जाईल.
- अनिल वानखडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म्हाडा)
----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com