ठाकरे बंधूंमुळे महायुतीला आव्हान
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र आल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या युतीमुळे भाजपबरोबर शिंदेंसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या पारंपरिक निष्ठावान मतदारांबरोबर सहानुभूती आहे. तर राज ठाकरे यांचा मराठी युवकांसह आक्रमक हिंदुत्ववादी मतदारांमध्ये प्रभाव आहे. दोघांचं एकत्र येणं म्हणजे मराठी मतांचे एकत्रीकरण होईल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मुंबईत ४० टक्के मराठी मते असून दादर, परळ, लालबाग, गिरगाव, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर, वांद्रे पूर्व भागातील आहेत. त्यामुळे ठाकरे निवडणुकीतही एकत्र आले तर या भागातून चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा तसेच लोकसभेत दोन्ही शिवसेना, भाजप आणि मनसेकडून हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यात आला होता. हेच कार्ड शिंदे गटाकडून वापरण्यात आले; पण राज ठाकरे आक्रमक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत. तर उद्धव ठाकरेदेखील हिंदुत्वाकडे वळताना दिसत असल्याने ही जोडगोळी मराठी मतांना खेचू शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे शिंदे यांच्या हातातून हिंदुत्वाचा मुद्दा जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच दोन्ही भाऊ एकत्र आल्याने भावनिक लाटेमध्ये शिंदे गटाचे मोठे नुकसान होऊ शकते.
------------------------------------
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- शिवसेना शिंदे गटातील अनेक नगरसेवक, कार्यकर्ते सत्ता पाहून शिंदे गटात आहेत; पण उद्धव-राज यांची युती झाली तर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. यामुळे शिंदे गटाच्या निवडणूक मोहिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप आणि शिंदे एकत्र असले तरी दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे भाजपलाही धक्का बसेल.
- मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि गद्दारी या त्रिसूत्रीवर ही युती आक्रमक मोहीम चालवण्याची शक्यता आहे. यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईत शिंदे गटासमोर जबरदस्त आव्हान उभे राहणार आहे. तसेच ‘खरी’ शिवसेना कोणाची, असा प्रश्न आजही मतदारांच्या मनात आहे; पण उद्धव आणि राज यांची युती झाल्यास आम्हीच खरी शिवसेना, आमच्याच रक्तात बाळासाहेब आहेत! ही भावना रुजवण्यासाठी ठाकरेंकडे संधी आहे.
..........
ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र आले तर त्यांचा प्रभाव नक्की राहील. त्यांना मराठी मतांचा निर्णायक फायदा होईल. हिंदी मतेही विभागण्याची शक्यता असल्याने तेही ठाकरेंच्याच पथ्यावर पडेल. ठाकरे बंधूंनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.
- जयंत माईनकर, राजकीय विश्लेषक
.......
ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांना पालिका निवडणुकीत नक्कीच फायदा होईल. तर शिंदे यांना फटाका बसण्याची शक्यता आहे. यामुळेच शिंदे यांच्या शिवसेनेत चिंता वाढली आहे. त्यातच शिंदे यांची मुंबईत फारशी ताकद नाही. यामुळे एकनाथ शिंदे यांची खरी कसोटी असणार आहे. त्यांना एकीकडे ठाकरे बंधू आणि दुसरीकडे भाजपसोबत राजकीय गणित जुळवण्यासाठी झुंज द्यावी लागणार आहे.
- हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक
.......
ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले असले तरी निवडणुकीसाठी एकत्र येतील, याबाबत शंका आहे. त्यांचे मराठी प्रेम बेगडी असल्याचे लोकांना माहीत आहे. मुस्लिम मते त्यांच्यापासून दूर गेल्याने त्यांना आता मराठीचा कळवळा आला आहे. शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही.
- शीतल म्हात्रे, प्रवक्ता, शिवसेना
.............
मुंबई पालिकेतील पक्षीय बलाबल (२०१७च्या निवडणुकीनुसार) :
शिवसेना - ८८
भाजप - ८४
काँग्रेस - ३१
राष्ट्रवादी काँग्रेस - ९
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - ७
समाजवादी पक्ष - ६
एमआयएम - २
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.