कान, नाक, घशाचे विकार वाढले

कान, नाक, घशाचे विकार वाढले

Published on

कान, नाक, घशाचे विकार वाढले
पावसाळ्यात स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्‍ला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : पावसाळ्यातील वातावरण सतत बदलत असते. हे वातावरण कधी ओले असते, कधी आर्द्र तर कधी कोरडे, तर कधी थंड असते. त्यामुळे संसर्गाच्या वाढीसाठी हे वातावरण अगदी पोषक ठरत असते. पावसाळ्यात चार ते १६ वयोगटासह कानाच्या संसर्गास तर २४ ते ६५ वयोगटातील प्रौढांमध्ये सायनुसायटिस किंवा घशाच्या संसर्गाचे प्रमाण वाढल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
दमट हवामानात जीवाणू मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे ते जीवाणूजन्य संक्रमणाला आमंत्रण देतात. त्‍यामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि हंगामी ॲलर्जी होऊ शकते. पावसाळ्याच्या दिवसात कान, नाक आणि घशासंबंधित तक्रारी वाढतात. वाढलेली आर्द्रता, तापमानातील चढ-उतार हे संसर्गास कारणीभूत ठरतात.
चार ते १५ वयोगटातील मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे त्यांना अशा संसर्गाचा धोका अधिक असतो. डे केअर आणि शाळकरी मुलांमध्ये संसर्ग पसरण्याचे प्रमाणदेखील इतर वयोगटातील व्यक्तींच्या तुलनेने अधिक असते.
अपोलो स्पेक्ट्रा मुंबईच्या कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. श्रुती शर्मा यांनी सांगितले, की हवामानातील आर्द्रतेमुळे कानाच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. कानात जमा होणाऱ्या मळातील ओलावा हा जीवाणू किंवा बुरशीवाढीसाठी पावसाळ्यातील वातावरण उत्तम ठरते. जीवाणूंमुळे कानासंबंधित संसर्ग वाढतो. सर्दी आणि तापासोबत अगदी किंचित ॲलर्जीमुळे संक्रमण होऊ शकते. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हिमोफिलस इन्फ्लूएंझा यांसारखे जीवाणू हे कानाच्या संसर्गाचे मुख्य कारण आहेत. ॲलर्जी, दमा किंवा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्ती, लहान मुले तसेच २५ ते ६५ वयोगटातील व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक असते.
कानाच्या संसर्गामध्ये स्वीमर्स इअर हा असा संसर्ग आहे, ज्यात पावसात भिजल्याने कानात पाणी जाणे, पोहताना किंवा अंघोळ करताना कानात पाणी गेल्याने संसर्ग होतो. जेव्हा आपले कान जंतूंनी भरलेल्या पाण्याच्या संपर्कात येतात. तेव्हा हा संसर्ग होतो. कानात पाणी जास्त असता हा संसर्ग होतो. कानाच्या संसर्गामुळे कानात वेदना होतात. ओटिटिस मीडिया हा कानातील मधल्या भागाचा संसर्ग आहे. याला मध्य कानाचा संसर्ग, असेही म्‍हणतात. पावसाचे पाणी तुमच्या कानात जाणार नाही, याची खबरदारी घ्या.

अशी घ्‍या काळजी
धुळीच्या किंवा बुरशीजन्य वातावरणाचा संपर्क टाळा. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि हायड्रेशनने रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे, कान कोरडे ठेवणे, कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळणे आणि पूरक आहाराने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचा सल्लादेखील डॉक्टर देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com