रक्ताचे अति संकलन नको!
रक्ताचे अति संकलन नको!
गणेशोत्सव, स्वातंत्र्यदिन, नवरात्रात दक्षतेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर मोठ्या सामाजिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन होत असते; मात्र यामुळे अनेकदा रक्ताचा अति साठा निर्माण होऊन त्याचा अपव्यय होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्त संकलन काळजीपूर्वक नियोजन करून करावे, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व रक्तपेढ्यांना केले आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये रक्तपेढ्यांकडे साधारणतः तीन महिन्यांचा साठा उपलब्ध असणे आवश्यक असते. त्यापेक्षा अधिक संकलन झाल्यास कालबाह्य होऊन रक्त नष्ट होण्याची शक्यता असते, असे परिषदेने निदर्शनास आणून दिले आहे. रक्तदान शिबिरांचे नियोजन करताना रक्तसाठा कमी होणार नाही किंवा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
रक्त अनमोल आहे. त्याचा अपव्यय होऊ नये यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच साठा व्यवस्थापन करावे, असेही राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व रक्तपेढ्यांना सूचना दिल्या आहेत.
-----
राजकीय दबाव अन् सुविधांचा अभाव
काही राजकीय पक्ष रक्तपेढ्यांवर शिबिरांद्वारे संकलनाचा दबाव आणतात, अशी तक्रार रक्तपेढ्या वारंवार करतात. या पार्श्वभूमीवर अशा पक्षांनी रक्त संकलन व साठा व्यवस्थापनाची वास्तव परिस्थिती समजून घ्यावी, असे सूत्रांनी सांगितले. याशिवाय शासकीय आणि महापालिकेच्या काही रुग्णालयांत रक्तघटक विभाजनाची सुविधा नसल्याने संपूर्ण रक्ताचा अपव्यय होतो. कांदिवली येथील शताब्दी, वांद्रे येथील भाभा, व्ही. एन. देसाई, जी. टी., कामा यांसारख्या रक्तपेढ्यांत ही समस्या प्रकर्षाने दिसते.
------
कर्मचारी हट्टामुळे एकाच पाळीत काम
काही रक्तपेढ्यांकडे पुरेसा कर्मचारीवर्ग असूनही कर्मचाऱ्यांच्या हट्टामुळे केवळ एकाच पाळीत काम केले जाते. परिणामी प्रसूतीसारख्या तातडीच्या प्रसंगी रक्तपेढी बंद असल्यामुळे बाहेरील साठ्यावर अवलंबून राहावे लागते. ‘रात्री उशिरा प्रसूती झाल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांनी काय करावे,’ असा सवाल रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.