बंबई हमको जमगई !
बंबई हमको जमगई!
आंदोलनात गाजतंय ‘स्वर्ग’ चित्रपटातील गाणं; मराठा आंदोलनात नवा जोश, नव्या लढ्याचं प्रतीक
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने एक नवीन रंग आणि ऊर्जा प्राप्त केली आहे. ‘बंब बंब बंब बंब बंबई... बंबई हमको जमगई’ हे १९९० मध्ये आलेल्या ‘स्वर्ग’ चित्रपटातील गाणे आता आंदोलकांसाठी केवळ एक गाणे न राहता, संघर्ष, आत्मविश्वास आणि चिकाटीचे प्रतीक ठरत आहे.
मुंबईसारख्या मोठ्या शहरात पहिल्यांदाच आलेले अनेक मराठा तरुण सुरुवातीला गोंधळलेले, अस्वस्थ होते. पावसाच्या सरी, अपुरी सोय, अपार श्रम आणि वाढती अस्वस्थता यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा वाढत होता; मात्र गोविंदा, राजेश खन्ना आणि जुही चावला यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘स्वर्ग’ चित्रपटातील हे गाणे आंदोलनात आशेचा किरण बनले आहे. जिथे जिथे हे गाणे वाजते, तिथे आंदोलक अक्षरशः जोशात, थरथरत्या पावलांनी ठेका धरताना दिसतात. पावसाचा मारा, खाण्यापिण्याची गैरसोय विसरून ते थिरकतात, घोषणांनी गगनभेदी आवाज करतात.
घोषणाबाजीसह हे गाणे वाजताच आंदोलक ताल धरून नाचू लागतात. टेम्पोसोबत अनेकांनी साऊंड सिस्टीम आणल्या आहे. यावर वाजणाऱ्या गाण्यांमध्ये हे गाणे टॉप चार्टवर आहे. भर पावसात हे गाणे लागताच भान विसरून नाचायला होते व दिवसभराचा थकवा गायब होतो, असे आंदोलक तरुण सांगतात. गोविंदा, राजेश खन्ना, जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्वर्ग’ या सिनेमातील हे गीत आहे. आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत असलेला गोविंदा या महानगरीत येऊन यशस्वी हीरो बनतो. याच पद्धतीने मुंबईला आम्ही आलोय, आमचे आरक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल आणि सर्वजण नायक म्हणून आमच्या गावात परतू, असा आत्मविश्वास मराठा तरुणांनी बोलून दाखवला.
मुंबई पहिल्यांदाच बघितली. सुरुवातीला वाटले एवढ्या मोठ्या शहरात कसे टिकणार; पण आता वाटतेय ‘बंबई हमको जमगई’!
- अक्षय सूर्यवंशी, वैजापूर
गाण्याच्या ठेक्यावर नाचताना दिवसभराचा थकवा जातो आणि लढण्याची ताकद दुप्पट होते.
- मयूर आवारे, बळेगाव
आरक्षण हा आमचा हक्क आहे. ‘मुंबई हमको जमगई’ गाणे लागले की असे वाटते, आम्ही हा हक्क मिळवूनच थांबणार.
- शुभम सूर्यवंशी, छत्रपती संभाजीनगर
पावसात भिजूनसुद्धा आम्ही आंदोलन सोडले नाही. या गाण्याच्या तालावर आमच्या संघर्षाला ऊर्जा मिळते.
- सिद्धार्थ दिवेकर, छत्रपती संभाजीनगर
मुंबईत मराठ्यांनी पाय ठेवून दाखवला आणि मुंबई जिंकून दाखवली. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठ्यांना असा विजय मिळाला नाही.
- मनोज जरांगे पाटील, क्रांती मोर्चा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.