मराठा आंदोलनाचा पालिका निवडणुकीवर परिणाम नाही!
मराठा आंदोलनाचा पालिका
निवडणुकीवर परिणाम नाही!
राजकीय विश्लेषकांचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मराठा आंदोलकांनी पाच दिवस आझाद मैदानावर ठिय्या देत मुंबईत आंदोलन केले. मुंबई ही विविध जाती-धर्माची, संस्कृतीची राहिलेली आहे. येथील मतदार ‘कोणत्या जातीचा नेता’ यापेक्षा ‘तो नेता काम किती करतो, समस्या सोडवतो का’ हे पाहतात. त्यामुळे मराठा आंदोलनाने तापलेल्या राजकीय वातावरणाचा महापालिका निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही, असे मत राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे.
मराठा आंदोलनादरम्यान ठाकरे बंधू एकत्र आल्याचे चित्र रंगवण्याचा सरकारचा प्रयत्न होता; परंतु आंदोलनातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निवडणुकीपूर्वी सोडवेल का, हा मोठा प्रश्न उभा आहे. मराठा आंदोलन संपले, तरी ओबीसी समाज मात्र नाराज झाला आहे. ओबीसींच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलनातून सरकारला फारसा फायदा झाला नाही आणि आंदोलकांच्या हातालाही काही नवे लागले नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत या आंदोलनाचा ठसा उमटेल, अशी शक्यता फारच कमी आहे. पुढे सरकार अंमलबजावणीत काय पावले उचलते, त्यावरच खरी राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
----
ग्रामीण महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती
मुंबईबाहेर मात्र समीकरणे वेगळी आहेत. ग्रामीण भागात मराठा समाजाची उपस्थिती निर्णायक आहे. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीवर आंदोलनाचा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कधी व कशी होते, यावर ग्रामीण भागातील मतदारांचे समीकरण अवलंबून असेल, असे विश्लेषकांचे मत आहे.
---
मुंबईतील सर्वसामान्य जनता या आंदोलनापासून लांबच राहिली. जातीचे राजकारण येथे चालणार नाही. त्यामुळे या आंदोलनाचा मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम होणार नाही.
- जयंत माईणकर, ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक
---
मुंबईत परिणाम नाही; पण ग्रामीण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या आंदोलनाचा परिणाम होऊ शकतो; मात्र ओबीसी समाज नाराज असल्याने भाजपला तोट्याचा सामना करावा लागू शकतो.
- हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक
----
आंदोलनातून काही ठोस निष्पन्न झालेले नाही. सरकारलाही आणि जरांगे पाटील यांनाही हे माहीत आहे. त्यामुळे मुंबईतील निवडणुकीवर याचा थेट परिणाम होणार नाही. ग्रामीण भागात मात्र पडसाद उमटू शकतात.
- प्रा. सुमित म्हसकर, राजकीय विश्लेषक
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.