धोकादायक पुलांचा बांधकाम खर्च वाढला

धोकादायक पुलांचा बांधकाम खर्च वाढला

Published on

धोकादायक पुलांचा बांधकाम खर्च वाढला
भांडुपमधील तीन प्रकल्‍प २९ वरून ४४ कोटींवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः भांडुप पूर्व परिसरात उषानगर नाल्यावर असलेल्या तीन नाल्यांचा प्रवाह वाढवून पूरस्थिती टाळण्यासाठी पुलांची पुनर्बांधणी सुरू करण्यात आली आहे. तीन धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीसाठीच्या कामाच्या खर्चात मोठी वाढ झाली असून पूल विभागाने याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. या कामासाठी ठेकेदार मे. ए.पी.आय. सिव्हीलकॉन प्रा.लि. यांना दिलेले मूळ कंत्राट २९.३५ कोटी रुपयांचे होते; मात्र तांत्रिक बदल आणि वाढीव कामामुळे आता ही रक्कम ४४.६३ कोटी रुपये होणार आहे.
महापालिकेच्या भांडुपमधील एस विभागातील मेनन कॉलेजजवळील चांमुडानगर पूल, चांमुडानगर हेमापार्कदरम्यानचा पूल आणि हेमापार्कजवळील वीर सावरकर मार्गावरील पूल असे ही तीन पूल आहेत. या तिन्ही पुलांवर गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पाणी साचणे, गंजलेल्या गर्डरमुळे धोकादायक स्थिती निर्माण होणे आणि वाहतुकीत अडथळे येणे या समस्या कायम होत्या. या पार्श्वभूमीवर पुलांचे संपूर्ण पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
पुलाच्या कामादरम्यान काही तांत्रिक बाबी बदलणे आवश्यक ठरले. जुन्या पुलावर असलेल्या ६०० आणि ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांचे स्थलांतर, फाउंडेशन पद्धत ‘ओपन’वरून ‘पाइल फाउंडेशन’मध्ये बदलणे, डेक स्लॅब आणि पाइलकॅप अधिक जाड करणे, या तिन्ही बदलांमुळे पूल अधिक मजबूत आणि टिकाऊ होणार आहेत. तसेच पावसाळ्यात नाल्यातील पाणी साचू नये, यासाठी विशेष पंप आणि साफसफाईची यंत्रणा बसविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
मूळतः हे काम २२ महिन्यांत पूर्ण करण्याची अट होती; मात्र वाढीव कामांमुळे आता कालावधी पावसाळा वगळून ३६ महिने करण्यात आला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठीची नवी मुदत ३१ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मे. पेन्टॅकल कन्सल्टंट प्रा. लि. यांना वाढीव कामाच्या प्रमाणात सुमारे ७९ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

पाण्याचा निचरा होणार सुरळीत
या पुलांची पुनर्बांधणी पूर्ण झाल्यानंतर भांडुप आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यातील पाणी साचणे, वाहतुकीतील अडथळे आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. ब्रिमस्टोवॅड अहवालानुसार या नाल्याचा प्रवाह वाढवून पूरस्थिती टाळण्यासाठी पुलांची पुनर्बांधणी अत्यावश्यक मानले गेले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, नव्या रचनेमुळे नालेसफाई, पावसाचे पाणी निचरा आणि वाहतूक व्यवस्थापन या तिन्ही बाबींमध्ये सुधारणा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com