जलबोगद्यांमुळे मुंबईचा पाणीपुरवठा अधिक सुरक्षित
जलबोगद्यांमुळे मुंबईचा पाणीपुरवठा अधिक सुरक्षित
कशेळी-मुलुंड जलबोगदा प्रकल्प प्रगतिपथावर; गळती व पाण्याची चोरी रोखण्यासाठी जलबोगदे प्रभावी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईची पाणीपुरवठा व्यवस्था ही जगातील सर्वांत मोठ्या आणि प्रगत योजनांपैकी एक असून, वाढती पाण्याची गरज आणि वहनातील गळती रोखण्यासाठी जलबोगद्यांचा पर्याय अत्यंत प्रभावी ठरत आहे. मुंबईत सुमारे १०० किलोमीटर लांबीचे जलबोगदे कार्यरत असून, अशी यंत्रणा राबवणारी मुंबई ही भारतातील पहिली आणि जगातील दुसरी महानगरपालिका ठरली आहे, असे प्रतिपादन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले.
कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाकादरम्यान उभारण्यात येत असलेल्या ७.१ किलोमीटर लांबीच्या जलबोगदा प्रकल्पाच्या कामाची पाहणी आयुक्त गगराणी यांनी आज केली. या वेळी उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) महेंद्र उबाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सध्या भातसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘मुंबई-२’ आणि ‘मुंबई-३’ या मुख्य जलवाहिन्या ठाणे शहरातून जातात. मात्र, ठाण्यातील वाढते नागरीकरण आणि विविध विकासकामांमुळे या वाहिन्यांना अडथळे निर्माण होत होते. ठाणे महानगरपालिकेच्या विनंतीनुसार आणि मुंबईचा पाणीपुरवठा अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने या वाहिन्यांच्या ऐवजी कशेळी ते मुलुंडदरम्यान जमिनीखाली जलबोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑक्टाेबर २०३० पर्यंत काम पूर्ण करणार
मुलुंड जकात नाका येथील १३४ मीटर खोल शाफ्टपैकी १३० मीटर उत्खनन पूर्ण झाले असून, कशेळी (भिवंडी) येथील १२८ मीटर खोल शाफ्टपैकी १५ मीटर उत्खनन पूर्ण झाले आहे. जुलै २०२६ पासून अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्र (टीबीएम) वापरून प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात होणार असून, सप्टेंबर २०२४ पासून सुरू असलेले हे काम ऑक्टोबर २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
जमिनीवरील जलवाहिन्यांमधून होणारी गळती, पाण्याची चोरी तसेच मानवी हस्तक्षेपाचा धोका जलबोगद्यांमुळे मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे जलबोगद्यांद्वारे पाणी वहन करणे हा तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि सुरक्षित पर्याय आहे.
-भूषण गगराणी,
आयुक्त, मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

