धूळ नियंत्रणासाठी अत्याधुनिक वाहने
धूळ नियंत्रणासाठी अत्याधुनिक वाहने
अनुभवी अभियांत्रिकी संस्था किंवा कंपन्यांकडून मागवले अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहरातील अरुंद गल्ल्या आणि मुख्य रस्त्यांवर साचणारी धूळ दाबण्यासाठी आता अत्याधुनिक मोबाईल वॉटर मिस्टिंग आणि स्प्रिंकलर यंत्रणा भाडेतत्त्वावर तैनात करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाने ई-निविदा प्रसिद्ध केली असून, २६ विशेष वाहनांचा ताफा शहरात दाखल होणार आहे.
मुंबईत सुरू असलेली बांधकामे आणि वाहतुकीमुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने दोन गटांत ही निविदा प्रक्रिया राबवली आहे. यामध्ये एकूण २६ वाहनांवर आधारित मोबाईल मिस्टिंग युनिट्सचा समावेश असेल. ही वाहने मुंबईतील छोट्या गल्ल्या आणि रस्त्यांवर फिरून हवेत पाण्याचे तुषार उडवतील. यामुळे उडणारी धूळ जमिनीवर बसेल आणि हवेची गुणवत्ता सुधारेल.
रस्ते आणि गल्ल्यांमधील धूळ नियंत्रणासाठी वाहन एक वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेतले जाईल. कामाचा कालावधी पूर्ण ३६५ दिवस इतका असेल. फेब्रुवारी महिन्यातच निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर देण्याचे नियोजन आहे. मुंबईतील जुना विभाग असलेल्या दक्षिण मुंबईसारख्या परिसरासह झोपडपट्टी भागातील अडगळीच्या जागेत ही वाहन फिरवली जाणार आहेत.
या कामासाठी अनुभवी अभियांत्रिकी संस्था, भागीदारी संस्था किंवा कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. जे कंत्राटदार मुंबई महापालिकेकडे नोंदणीकृत नाहीत त्यांना कंत्राट मिळाल्यास तीन महिन्यांच्या आत नोंदणी करणे अनिवार्य असेल अन्यथा त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाऊ शकते.
प्रदूषणाची पातळी कमी करण्याचा प्रयत्न
मुंबईतील नागरिकांना शुद्ध हवा मिळावी आणि प्रदूषणाची पातळी कमी व्हावी, या हेतूने ही नवी यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. गल्लीबोळातील धूळ नियंत्रणात आल्यास श्वसनाचे विकार कमी होण्यास मदत होईल, असे पालिकेच्या पर्यावरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

