माध्यमांवरील कॉर्पोरेट  नियंत्रण कमी व्हावे  : पृथ्वीराज चव्हाण

माध्यमांवरील कॉर्पोरेट  नियंत्रण कमी व्हावे  : पृथ्वीराज चव्हाण

Published on

माध्यमांवरील कॉर्पोरेट  नियंत्रण कमी व्हावे 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मत

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ६  : आजच्या स्थितीत माध्यमांवर कोणत्या ना कोणत्या कॉर्पोरेटचे  वर्चस्व असल्याने आवश्यक स्वातंत्र्य मिळू शकत नाही. माध्यमांवरील कॉर्पोरेटचे  नियंत्रण  कमी व्हायला हवे,  असे मत  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ते ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या लेखसंग्रहाचे लोकार्पण करताना ते बोलत होते.
या वेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व साधना जाधव, सदामंगल प्रकाशनच्या प्रकाशक-संपादक प्रज्ञा जांभेकर आणि जयंत माईणकर उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, आज अंबानी, अदाणी, सुभाषचंद्र यांच्याकडे किती चॅनेल्स आहेत, याचा अभ्यास केला, तर त्यांचा आवाका किती मोठा आहे, हे लक्षात येईल. मीडियावरील हा कॉर्पोरेट कंट्रोल कमी झाला पाहिजे. त्यावर काही मर्यादा आल्या पाहिजेत. तसेच मीडियाच्या विविध भागात केवळ एका कॉर्पोरेट हाउसने प्रवेश करावा का, यावरही मर्यादा असाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. हा प्रयत्न एस. जयपाल रेड्डी माहिती व नभोवाणी मंत्री असताना करण्यात आल्याचा हवाला देत ते पुढे म्हणाले, की अनेक देशांत अशा प्रकारची बंधने आहेत. भारतात गेल्या दहा-बारा वर्षांत अशा प्रकारच्या बंधनांची अधिक गरज निर्माण झाली आहे.
तसेच माईणकरांनी अशा अनेक विषयांना हात घातला आहे, ज्यावर मराठीत फारसे लिहिले जात नाही. पक्षांतराविषयीचा माईणकरांचा लेख किंवा वाजपेयी, जॉर्ज आणि प्रेमप्रकरण यांसारखे विषयही त्यांनी हाताळले आहेत.
‘कटाक्ष’ हा स्तंभ ज्या दैनिकात छापला गेला त्या ‘देशोन्नती’चे मालक-संपादक प्रकाश पोहरे यांनी गेली सात वर्षे दर आठवड्याला नवनव्या राजकीय विषयांना हात घालत आपल्या लेखणीचे फटकारे ओढणाऱ्या माईणकरांविषयी सांगितले. त्यांच्या एका भाषणाने प्रभावित होऊन आपण स्वतः त्यांना भेटल्याचा किस्साही त्यांनी सांगितला.
माजी खासदार कुमार केतकर  म्हणाले , की मानवतावादी पत्रकार सिलेक्टिव्ह असतात. इराण विरुद्ध  अमेरिका आणि इस्राईल  युद्धात  अमेरिका आणि इस्राईलला माध्यमांकडून झुकते माप देण्यात येत आहे. अमेरिकेतील पत्रकारही आता हिम्मत दाखवत  नाहीत. पत्रकार अभिमानाचा काळ संपला आहे. परखड बोलणारे  पत्रकार कमी असून त्यादृष्टीने जयंत माईणकर यांचे पुस्तक महत्त्वाचे आहे.  सध्या इतक्या परखड लिखाणाची फार गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेस नेते  माणिकराव ठाकरे यांनी माईणकरांच्या अभ्यासपूर्ण प्रश्न विचारण्याच्या पद्धतीची प्रशंसा करत, आपल्या मुद्द्यांवर ते कसे ठाम असतात, हेही सांगितले.
==
फोटो ओळ ः 
जयंत माईणकरलिखित ‘कटाक्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व साधना जाधव, सदामंगल प्रकाशनच्या प्रकाशक-संपादक प्रज्ञा जांभेकर आणि जयंत माईणकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com