शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती

शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती

Published on

शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती
म्हाडाकडून केंद्राशी पाठपुरावा; लवकरच हिरवा कंदील
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात असतानाच आता शिवडी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास मार्गी लागणार असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बीपीटीच्या जागेवर या चाळी आहेत. त्यापार्श्वभूमीवर केंद्राची परवानगी मिळावी म्हणून म्हाडाकडून केंद्राकडे जोर-बैठका सुरू असून, लवकरच पुनर्विकासाकरिता परवानगी मिळणार आहे. त्यामुळे येथील ९६६ कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
१९२०च्या दशकात ब्रिटिश सरकारने कामगारांसाठी वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि शिवडी येथे बीडीडी चाळी उभारल्या होत्या. सुमारे १६०-१८० चौरस फुटांच्या या चाळीमध्ये गेल्या आठ दशकांहून अधिक काळापासून अनेक जण वास्तव्यास आहेत. त्यांना ५०० चौरस फुटांचे घर देण्याची घोषणा राज्य सरकारने २०१४मध्ये केली होती. त्यानुसार राज्य सरकारच्या जागेवर असलेल्या वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथे पुनर्विकासाची कामे जोरात सुरू असून वरळी, नायगाव येथील अनेक रहिवाशांना घरांचा ताबाही दिली आहे. मात्र शिवडी बीडीडी चाळी केंद्राच्या अखत्यारित असलेल्या बीपीटीच्या जागेवर आहेत. त्यामुळे केंदाच्या मंजुरीशिवाय येथील चाळींचा पुनर्विकास शक्य नाही. त्यामुळे म्हाडाकडून सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा सुरू असून, लवकरच मंजुरी मिळेल असे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले. त्यामुळे शिवडी बीडीडी येथील १२ चाळींचा पुनर्विकास मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाचशे चौरस फुटांचे घर
वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडीवासीयांना ५०० चौरस फुटांचे घर दिले जात असून, आतापर्यंत सुमारे १,४०० रहिवाशांना घरांचा ताबा दिला आहे. लवकरच दीड हजार रहिवाशांना घराचा ताबा दिला जाणार आहे. त्याच धर्तीवर शिवडी बीडीडी चाळकऱ्यांना ५०० चौरस फुटांचे घर मिळणार असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

२०२९पर्यंत घरांचा ताबा मिळणार का?
बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील चाळींच्या ठिकाणी पुनर्विकासाची कामे जोरात सुरू असून, २०२९ पर्यंत सर्व रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दरम्यान, शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची कामे अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे २०२९ पर्यंत येथील रहिवाशांना पुनर्विकासित घरांचा ताबा मिळू शकेल का, हा प्रश्न कायम आहे.

शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारसोबत म्हाडाच्या बैठका सुरू आहेत. त्यानुसार लवकरच पुनर्विकासासाठी केंद्राकडून परवनगी मिळण्याची शक्यता असल्याने येथील रहिवाशांनाही सुसज्ज घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
- संजीव जयस्वाल,
उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com