

मुंबईतील रक्तपेढ्यांचे खासगीकरण थांबवा
अखिल पार्क साईट सेवा संघ आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतील रक्तपेढ्या पीपीपी तत्त्वावर खासगी संस्थांकडे देण्याच्या हालचालींना विरोध वाढत आहे. अखिल पार्क साईट सेवा संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी, वांद्रे येथील भाभा, कांदिवली येथील शताब्दी, कुर्ला येथील भाभा आणि बोरिवली येथील भगवती रुग्णालयांतील रक्तपेढ्यांसाठी निविदा मागवण्यात आल्याने चिंता व्यक्त होत आहे. या प्रक्रियेमुळे गोरगरीब रुग्णांना मिळणारा मोफत रक्तपुरवठा बंद होऊन रक्ताचे व्यापारीकरण होण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.
संस्थेचे अध्यक्ष सुनील काजरोळकर यांच्या मते, खासगीकरण झाल्यास सध्या मोफत मिळणारे रक्त भविष्यात महाग दराने विकत घ्यावे लागेल. तसेच पांढऱ्या व लाल पेशी, अल्ब्युमिनसारख्या घटकांसाठीही मोठा खर्च करावा लागू शकतो. यामुळे सामान्य रुग्णांच्या खिशावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. खासगी संस्थांमुळे मक्तेदारी वाढून नियमभंग आणि भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय सामाजिक भावनेतून आयोजित रक्तदान शिबिरांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मोफत रक्तदान करणाऱ्या दात्यांमध्ये निरुत्साह निर्माण झाल्यास रक्तसाठ्यावर परिणाम होऊ शकतो, असेही काजरोळकर यांनी सांगितले.
सक्षमीकरण करणे आवश्यक
रक्त तपासणी प्रक्रियेत दर्जाबाबत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या निर्णयाचा सर्वाधिक फटका थॅलेसेमियाग्रस्त मुले, गर्भवती महिला, कॅन्सर रुग्ण, सिकल सेल पीडित आणि अपघातग्रस्तांना बसणार आहे. नियमित रक्ताची गरज असलेल्या या रुग्णांसाठी खर्च आणि मानसिक ताण वाढण्याची भीती आहे. महापालिकेच्या रक्तपेढ्यांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे, खासगीकरण नव्हे अन्यथा सामाजिक संस्था आणि रक्तदाते आंदोलन छेडतील, असा इशाराच काजरोळकर यांनी दिला आहे.