

‘नर्चर’ प्रणाली प्रभावी
महाराष्ट्रात बाल कुपोषणात लक्षणीय घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : महाराष्ट्रात बाल कुपोषण कमी करण्यासाठी ‘नर्चर’ ही डिजिटल प्रणाली प्रभावी ठरत आहे. महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बालकांच्या पोषण व्यवस्थापनात मोठी सुधारणा झाली आहे.
अंगणवाडी केंद्रांमध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुलांचे मोजमाप करण्याचे प्रमाण मार्च २०२३ मधील ७६% वरून मार्च २०२६ मध्ये जवळपास १००% झाले आहे. तसेच पोषणाबाबत जनजागृती कार्यक्रमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून कुटुंबांमध्ये जागरूकता वाढली आहे. अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटींमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे बालकांचे नियमित निरीक्षण शक्य झाले आहे. याचा थेट परिणाम म्हणजे कुपोषणात लक्षणीय घट दिसून आली आहे. अतितीव्र कुपोषण १.९३% वरून ०.३०% पर्यंत, तर मध्यम कुपोषण ५.०९% वरून २.१०% पर्यंत कमी झाले आहे.
विशेष उपाययोजना
‘नर्चर’ प्रणालीमुळे प्रत्येक कुपोषित बालकावर लक्ष ठेवले जाते. त्यांना आवश्यक पोषण आहार दिला जातो आणि गरज असल्यास उपचारासाठी पाठवले जाते. नंदुरबार, पालघर आणि अमरावतीसारख्या भागांत विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. एकूणच तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि जनसहभाग यांच्या मदतीने महाराष्ट्राने बाल कुपोषण कमी करण्यामध्ये मोठे यश मिळवले आहे.