

महामानवाच्या चरणी नेत्यांनी टेकविला माथा
मुंबई, ता. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आज मुंबईतील चैत्यभूमीवर राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. राजकीय नेत्यांनी महामानवाला अभिवादन केले. या वेळी नेत्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करीत संविधानाप्रति आपली निष्ठा व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रिपब्लिकन चळवळीच्या ऐक्यावर भर दिला. ते म्हणाले, ‘‘बाबासाहेब यांनी दिलेला रिपब्लिकन पक्ष हाच आमचा खरा वारसा आहे. माझी मनापासून इच्छा आहे की, देशपातळीवर एकच प्रबळ रिपब्लिकन पक्ष असावा. सर्व जाती-धर्मांना न्याय देणारी बाबासाहेबांची भूमिका आजही देशाला दिशा देणारी आहे.’’ राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी संविधानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले आहे. आज आम्ही जे काही काम करत आहोत, ते याच संविधानाच्या चौकटीत राहून करत आहोत,’’ असे त्यांनी नमूद केले. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी म्हणाले, ‘‘बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून भारताला एका धाग्यात गुंफले आहे. त्यांच्या स्वप्नातील भारत घडवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’’ माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाबासाहेबांनी स्त्रियांना दिलेल्या अधिकारांचे स्मरण केले. ‘‘आज स्त्रिया ज्या आत्मविश्वासाने वावरत आहेत, त्याचे श्रेय बाबासाहेबांना जाते,’’ असे त्या म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.