

पाळीव प्राणी, पक्ष्यांसाठी दहनवाहिनी सुविधेचा विस्तार
महालक्ष्मी, देवनार येथे केंद्र सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईतील पाळीव प्राणी आणि भटक्या प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाने देवनार पशुवधगृह आणि महालक्ष्मी येथे नवीन दहनवाहिन्या कार्यान्वित केल्या आहेत. १ एप्रिलपासून या सुविधा नागरिकांसाठी खुल्या झाल्या असून, त्यामुळे आता मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे अशा तिन्ही भागांत स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध झाली आहे.
लहान प्राण्यांसाठी दहनवाहिनी कार्यान्वित करण्याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन करत पालिकेने ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केली आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक रहिवाशांना आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आता दूरवर जाण्याची गरज पडणार नाही.
या उपक्रमामुळे मृत प्राण्यांची विल्हेवाट लावताना होणारी गैरसोय टळणार असून, आरोग्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. अधिक माहिती किंवा तातडीच्या मदतीसाठी पशूवैद्यकीय आरोग्य विभागाने ७५६४९७६६४९ हा हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला असून, त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागप्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण यांनी केले आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईतील प्राणीप्रेमींसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
ऑनलाइन नोंदणी आणि संपर्क
नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली आहे. मृत प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना https://vhd.mcgm.gov.in/incineration-booking या लिंकवर जाऊन आगाऊ नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या विहित वेळेत संबंधित केंद्रावर जाऊन अंत्यविधी करता येतील.
विभागांनुसार सुविधेचा तपशील
- देवनार पशुवधगृह (पूर्व उपनगरे) : येथे ५०० किलो वजनापर्यंतचे प्राणी किंवा पक्ष्यांवर अंत्यसंस्कार करता येतील. ही यंत्रणा पीएनजी इंधनावर आधारित असून, पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.
- महालक्ष्मी (शहर विभाग) : महापालिका व टाटा ट्रस्ट संचालित प्राण्यांच्या रुग्णालय परिसरात ही सुविधा आहे. येथे ५० किलो वजनापर्यंतच्या प्राण्यांसाठी विद्युत दहनवाहिनी उपलब्ध आहे.
- मालाड (पश्चिम उपनगरे) : येथे २०२३ पासूनच दहनवाहिनी कार्यरत आहे.