रिवा एक्स्प्रेसही नियमित; दादर-रत्नागिरी कधी?

रिवा एक्स्प्रेसही नियमित; दादर-रत्नागिरी कधी?
Published on

रिवा एक्स्प्रेसही नियमित; दादर-रत्नागिरी कधी?

उत्तर भारतातील गाड्यांवरून काेकणवासीयांचा सवाल

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : राज्यातील मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रश्न कायम असताना मध्य रेल्वेने उत्तर भारतातील विशेष गाड्यांना नियमित करण्याचा सपाटा लावला आहे. दादर-गोरखपूरनंतर रिवा एक्स्प्रेसलाही नियमित करण्यात आले आहे. कोकणातील प्रवाशांनी अनेकदा मागणी करूनही दादर-रत्नागिरी गाडीची सेवा अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे मुंबईतील खासदारांची ‘दिल्ली’त चालत नाही का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी, एलटीटी, दादर, पनवेल येथून देशाच्या विविध भागांत रेल्वेगाड्या धावत आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. त्याच वेळी राज्यातील विशेषत: कोकण मार्गावरील गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. वेळापत्रक कोलमडल्याने कनेक्टिंग गाड्या चुकणे, प्रवासाचे नियोजन बिघडणे, यांसारख्या अडचणींना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष न देता गाडी क्रमांक ०२१८७/०२१८८ रिवा-सीएसएमटी-रिवा ही साप्ताहिक विशेष गाडी नियमित करण्यात आली आहे. नव्या क्रमांकानुसार २०१५४ रिवा-सीएसएमटी आणि २०१५३ सीएसएमटी-रिवादरम्यान ही २४ डब्यांची अतिजलद एक्स्प्रेस धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने प्रसिद्धिपत्रकातून दिली आहे.

रत्नागिरी गाडी प्रलंबितच
लोकल गाड्यांना फटका बसत असल्याचे सांगून दादर-रत्नागिरी गाडी रद्द करून ती दिवा-रत्नागिरी अशी चालवण्यात येत आहे. त्याच वेळी दादर-गोरखपूर गाडीला नियमित करण्यात आले. निवडक लोकप्रतिनिधींनी याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर दादर-रत्नागिरीसाठी व्यवहार्यता तपासण्याच्या सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वेला दिल्या आहेत. याउलट उत्तर भारतातील गाड्यांना नियमित स्वरूप देण्याचे निर्णय झपाट्याने घेतले जात असल्याने काेकणवासीयांसह राज्यभरातील प्रवाशांमध्ये नाराजीची भावना आहे.
----
राज्यांतर्गत ३० गाड्या बंद
कोल्हापूर-मुंबई, भुसावळ-मुंबई, नांदेड-एलटीटी, पुणे-पनवेल, अजनी-एलटीटी अशा राज्यांतर्गत धावणाऱ्या किमान ३० एक्स्प्रेस बंद करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वे राज्यातील गाड्यांना मुंबईत प्रवेश नाकारून अन्य राज्यातील गाड्यांना पायघड्या घालत आहे. यासाठी रविवारी दादर येथे महाराष्ट्र रेल्वे परिषद आयोजित करण्यात आली आहे. रेल्वेमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य सूचना देण्याची आवश्यकता आहे, असे रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी सांगितले.
-----
उत्तर भारतातील गाड्यांचे निर्णय झपाट्याने होतात; पण महाराष्ट्रातील प्रवाशांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते, ही वस्तुस्थिती आहे. दादर-रत्नागिरीसारखी गाडी अजूनही प्रलंबित आहे. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मुंबई आणि कोकणातील सर्व खासदारांनी एकत्र येऊन या मागणीसाठी ठोस भूमिका घ्यायला हवी.
- अमर काळे, खासदार, राष्ट्रवादी काॅँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
.......
मनसे आणि शिवसेनेने दादर-रत्नागिरी गाडीसाठी रेल्वेला पत्र देऊन पाठपुरावा केला आहे. हा केवळ एक-दाेन पक्षांचा मुद्दा नसून संपूर्ण कोकणातील जनतेचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व पक्षांचे खासदार आणि लोकप्रतिनिधींनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र यावे. रस्त्यावर उतरून ही मागणी लावून धरावी.
- डॉ. दीपक पवार, अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com