

घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस आभासी अटकेत
पोलिसांच्या वेशात सायबर भामट्यांनी उकळले १.१० कोटी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः घाटकोपर येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबाला तब्बल १८ दिवस आभासी अटकेत ठेवून सायबर भामट्यांनी १.१० कोटी रुपये उकळल्याचे प्रकरण पोलिसांकडे तपासासाठी आले आहे.
घाटकोपर येथे राहणारे ८५ वर्षीय वयोवृद्ध जोडपे आणि त्यांच्या ४७ वर्षीय अविवाहित कन्येस भामट्यांनी पोलिस असल्याचे भासवत ५ ते २२ एप्रिल यादरम्यान घरातील एका खोलीत डांबून ठेवले होते. याप्रकरणी सायबर पोलिसांनी (पूर्व विभाग) गुन्हा नोंदवून तपास आरंभला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कन्या अंधेरी येथील खासगी कंपनीत काम करते. तिचे वडील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधून सेवानिवृत्त झाले. आई महापालिकेतील शाळेत उपमुख्याध्यापिका होती. तीही सेवानिवृत्त आहे.
५ एप्रिल रोजी पोलिसांच्या वेशात सायबर भामट्यांनी कुटुंबाला संपर्क साधला. लखनौ पोलिसांनी केलेल्या कारवाईत वडलांचे आधार कार्ड वापरून सुरू करण्यात आलेल्या बँक खात्याद्वारे दहशतवाद्यांना ८० लाख रुपये पुरवल्याचा आरोप केला. या गुन्ह्यात वडिलांना आरोपी करण्यात आले असून, त्यांना चौकशीसाठी लखनौला यावे लागेल, असे सांगितले.
वडील ८५ वर्षांचे असून, त्यांना राहते घर सोडून कोठेही जाणे शक्य नसल्याचे मुलीने सांगितले. तेव्हा भामट्यांनी व्हिडिओ कॉल केला. समोर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गणवेशात बसलेल्या व्यक्तीने अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाला आभासी अटक करत आहोत. या पुढील सर्व संवाद, चौकशी आदी सिग्नल ॲपद्वारे होईल, असे सांगत कुटुंबाला ते डाऊनलोड करण्यास भाग पाडले. सर्वोच्च न्यायालयाच्या नावे जप्ती आणि अटक वॉरंट असे लिहिलेली दोन पत्रे पाठवली. या सर्व अभ्यासामुळे या कुटुंबाला खरेच ही पोलिस कारवाई सुरू आहे असे वाटले.
गुन्ह्यात सहभाग नसल्यास ही रक्कम परत केली जाईल तसेच क्लिअरन्स सर्टिफिकेट दिले जाईल, असेही सांगत भामट्यांनी या कुटुंबाकडून तीन टप्प्यात १.१० कोटी रुपये उकळले. त्यानंतर भामट्यांनी वडिलांच्या नावे असलेल्या मुदतठेवी मोडून आणखी रक्कम पाठवण्यास सांगितले. यादरम्यान तक्रारदार महिलेस आभासी अटकेच्या बहाण्याने होत असलेल्या फसवणुकीबाबत माहिती मिळाली तेव्हा तिने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
रिझर्व्ह बँकेच्या पावत्या!
भामट्यांनी या कुटुंबाकडून तीन टप्प्यांत १.१० कोटी रुपये उकळले. प्रत्येक व्यवहारानंतर त्यांनी या कुटुंबास रिझर्व्ह बँकेच्या नावे पैसे प्राप्त झाल्याची पावती दिली. या पावतीमुळे आपले पैसे सुरक्षित आहेत, तपास पूर्ण होताच सर्व रक्कम परत मिळेल याबाबत कुटुंब आश्वस्त झाले.
...तर जीवाला धोका
तपास गोपनीय पद्धतीने सुरू आहे. आभासी अटक मोडून घराबाहेर पडाल, तर जीवाचे बरेवाईट होऊ शकेल. त्यास आम्ही जबाबदार नाही. भामट्यांनी अशी भीती घातल्याने ही कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडले नव्हते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.