

कामगार संघटनांची
१ मे रोजी भव्य रॅली
मुंबई, ता. २६ : शंभर वर्षापेक्षा अधिक काळ लढल्यानंतर मिळालेले कामगार कायदे मोडीत काढून केंद्र सरकारने कामगार चळवळीला बाधक ठरणाऱ्या चार कामगार संहिता लागू केल्या. सरकारच्या या धोरणाबाबत कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने १ मे रोजी कामगारदिनी परळ रेल्वे स्थानक ते राष्ट्रीय मिल मजदूर संघापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात इंटक, एचएमएस, आयटक, सिटू, एआयसीसीटीयू, भारतीय कामगार सेना, टीयूसीआय तसेच बँक, विमा, शिक्षक संघटना गेल्या १० वर्षांपासून लढत आहेत. या पार्श्वभूमीवर कामगार कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. सायंकाळी पाच वाजता महात्मा गांधी सभागृहात कामगारांचा महामेळावा पार पडेल. या वेळी कामगार नेते, माजी राज्यमंत्री आमदार सचिन अहिर उपस्थित राहणार आहेत.