दहिसर नदी प्रकल्प देशासाठी आदर्श ठरावा!

दहिसर नदी प्रकल्प
देशासाठी आदर्श ठरावा!
Published on

दहिसर नदी प्रकल्प
देशासाठी आदर्श ठरावा!
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा विश्वास
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १० : दहिसर नदी पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण प्रकल्प हा देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. मुंबईतील नद्यांच्या स्वच्छतेसाठी केवळ महापालिकेचे प्रयत्न पुरेसे नसून, नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन गोयल यांनी या प्रकल्पाच्या उद्‍घाटनप्रसंगी केले.
देशभरात ३५० नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य सुरू आहे. दहिसरमध्ये एसटीपी प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटन आणि मनोरंजनाच्या संधी निर्माण होत आहेत. नदीपात्रातील गाळ काढून नैसर्गिक पाण्याचे झरे जिवंत केल्यास पुराची समस्याही दूर होईल, असे गोयल म्हणाले. महापालिकेने या प्रकल्पांतर्गत ‘मेम्ब्रेन बायोरिएक्टर’ तंत्रज्ञानावर आधारित दोन मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रे उभारली आहेत. यामध्ये बोरिवली (पूर्व) येथील १.५ एमएलडी आणि दहिसर (पश्चिम) येथील पाच एमएलडी क्षमतेच्या केंद्रांचा समावेश आहे. या प्रक्रियेतून शुद्ध झालेले पाणी रस्ते स्वच्छता, बागकाम आणि बांधकामासाठी वापरले जाणार आहे. या सोहळ्याला उपमहापौर संजय घाडी, आमदार मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
---
बाधितांसाठी घरांची सुविधा
प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या १,२४४ कुटुंबांसाठी घरांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ४.७५ किमी लांबीच्या नदीपात्राचा कायापालट करणाऱ्या या प्रकल्पाने परिसरातील सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचा दर्जा सुधारण्यास मोठी मदत होणार असल्याचे आमदार चौधरी म्हणाल्या.
........

Marathi News Esakal
www.esakal.com