

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने नेणारा नवा प्राप्तिकर कायदा
मुंबई, ता. १३ : नवा प्राप्तिकर कायदा हा आजच्या आणि उद्याच्या भारतासाठी डिजिटल युगाची वास्तवता ओळखणारा असून, भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेणारा आहे, असे प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त आलोक कुमार यांनी येथे सांगितले.
नवा प्राप्तिकर कायदा २०२५ हा यावर्षीच्या १ एप्रिलपासून लागू झाला असून, त्याविषयी जनजागृती करण्यासाठी प्राप्तिकर खात्यातर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. मंगळवारी त्यातील पहिल्या कार्यक्रमात आलोक कुमार यांच्यासह ज्येष्ठ व्यावसायिक डॉ. निरंजन हिरानंदानी, अभिनेता अर्जुन कपूर आदी मान्यवर हजर होते.
जुना कायदा १९६१चा असल्याने नंतर न्यायालयाचे आदेश, अर्थसंकल्पीय सुधारणा, कायद्यातील बदल यामुळे त्याचे स्वरूप वेगळेच झाले होते. आता आपली अर्थव्यवस्था प्रचंड बदललेली असल्याने करदात्यांची सेवा करणे या हेतूने या कायद्यात बदल करण्यात आले. हा कायदा आता सीए मंडळींसाठीही अत्यंत सोपा झाला असून, त्यांना त्याचा अर्थ कमीत कमी वेळात लावता येईल. त्यामुळे त्यांना करदात्यांना सल्ला द्यायला जास्त वेळ मिळेल, तर आता कायद्यामुळे वाद कमी होणार असल्यामुळे कोर्टबाजी कमी होईल. अशा स्थितीत व्यापाऱ्यांनाही आत्मविश्वासाने गुंतवणूक करता येईल, असेही कुमार म्हणाले.
----
पारदर्शकतेला चालना
नव्या प्राप्तीकर कायद्याच्या रचनेमुळे पारदर्शकतेला चालना मिळेल. क्लिष्ट तरतुदी काढून टाकल्यामुळे अंमलबजावणीची प्रक्रिया सुलभ होईल. तसेच नागरिक आणि सरकार यांच्यातील विश्वास वाढेल, असे निरंजन हिरानंदानी म्हणाले. तर या जागृती मोहिमेबद्दल आणि कर प्रक्रिया सुलभ करण्याबद्दल अर्जुन कपूर यांनी प्राप्तिकर विभागाचे आभार मानले.
----
नव्या कायद्यामुळे आता गोंधळ जाऊन स्पष्टता येईल, लोकांना कायदा कळेल आणि व्यावसायिकदेखील निर्धास्त होतील. यातूनच आत्मनिर्भरता येईल. डिजिटली सक्षम करदात्यांसाठी हा अत्यंत सोपा आणि सुलभ कायदा असून, तो कार्यक्षम आणि वाढीला पोषक असा आहे. भारत हे साऱ्या जगात गुंतवणुकीसाठी प्रमुख स्थान करण्याचा या नव्या कायद्याचा हेतू आहे. या कायद्याने करदात्यांचे प्रश्न आधीच ओळखले आहेत.
-आलोक कुमार, प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.