

पिसे पांजरापूर प्रकल्पाचा प्रस्ताव अखेर स्थगित!
सुधारित आराखडा सादर करणार
मुंबई, ता. १३ : पिसे पांजरापूर येथील वीजपुरवठा केंद्राला ४६ वर्षे होत आली. तीन टप्प्यांत काम झाले आणि आता नवीन केंद्र उभारण्यासाठी सल्लागाराला २३ कोटी रुपये पालिका प्रशासन मोजणार आहे. याबाबतचा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी आणावा, तोपर्यंत प्रस्ताव प्रस्ताव स्वीकारू नये, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते अमय घोले यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केली. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी घोले यांच्या उपसूचनेला पाठिंबा दिला. सदस्यांच्या आक्षेपानंतर सुधारित प्रस्ताव सादर करा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.
मुंबईला अधिक स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात ९१० दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून मुंबई महापालिका सल्लागाराला २३ कोटी रुपये मोजणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. या वेळी ठाकरे सेनेचे स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांनी घोले यांच्या उपसूचनेला पाठिंबा दिला. १९७९ ते २००७ या कालावधीत तीन टप्प्यांत पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. तब्बल ४७ वर्षांपासून सुरू असलेल्या वापरामुळे आणि क्लोरीनसारख्या रसायनांच्या सतत संपर्कामुळे या केंद्राच्या संरचनेची मोठ्या प्रमाणात झीज झाली. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प केंद्र उभारण्याची गरज आहे का, हे तपासण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांची चौकशी करा!
पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केली. माहिती सविस्तर सादर करण्यात यावी, असे सांगत सुधारित प्रस्ताव सादर करा, असे निर्देश प्रभाकर शिंदे यांनी या वेळी दिले.