

शिवसागर गोविंदा पथक सादर करणार ‘पावनखिंड’
देखाव्यातून तरुणांना नशामुक्तीचा संदेश
मुंबई, ता. ६ : दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा जपत मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाने यंदा नशामुक्तीचा संदेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मावळ्यांच्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देत आजच्या तरुण पिढीला व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन यावर्षीच्या देखाव्यातून करण्यात येणार आहे. पथकाने यंदाच्या सादरीकरणासाठी ‘पावनखिंड’हा ऐतिहासिक विषय निवडला असून, त्यामध्ये थोर मावळे बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची कथा मांडण्यात येणार आहे. यापूर्वी पथकाने तानाजी मालुसरे आणि गेल्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा विषय सादर केला होता.
पथकाच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, यंदाच्या सादरीकरणाचा आधार इतिहासच आहे; मात्र ऐतिहासिक शौर्याची तुलना आजच्या तरुणांच्या परिस्थितीशी करून त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. व्यसनाधीनतेमुळे कुटुंबांवर होणारे दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंभीर सामाजिक समस्या याकडेही लक्ष वेधले जाणार आहे.
‘पूर्वजांनी आपल्या वयात स्वराज्यासाठी रक्ताचे बलिदान दिले. आजची पिढी मात्र व्यसनांच्या आहारी जात आहे. शंभर मुलांपैकी एकाने जरी हे सादरीकरण पाहून ‘नशा करणे चुकीचे आहे, आपण चुकीच्या मार्गावर आहोत’ असा विचार केला आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणला, तरी आमच्या या प्रयत्नाचे सार्थक होईल,’ असा संदेश पथक सदस्य प्रतीक बोभाटे यांनी दिला आहे.
या सादरीकरणासाठी सुमारे ३५० ते ४०० गोविंदा सहभागी होणार असून, दीड महिन्यांपासून त्यांची सरावाची तयारी सुरू आहे. रात्री ११ वाजता सुरू होणारा सराव अनेकदा पहाटे ३ वाजेपर्यंत चालत असे. अंतिम सरावही पहाटे ४.३० वाजेपर्यंत करण्यात आला.
यंदाच्या दिवसभराच्या कार्यक्रमाची सुरुवात दादर येथील आयडियलपासून होणार आहे. त्यानंतर वरळीतील जांभोरी मैदान, गोरेगाव, कांदिवली आणि मालाड अशा विविध ठिकाणी पथकाचे सादरीकरण होणार आहे. दिवसाचा शेवट मालाड येथील आदिशक्तीपीठ भवानी माता मंदिरात होणार असून, सकाळी ९.३० ते १०च्या सुमारास पथक तेथे पोहोचण्याचे नियोजन आहे.