किनारा सुशोभीकरणाला गती

किनारा सुशोभीकरणाला गती
Published on

मुरूड, ता. ९ (बातमीदार) ः प्रदूषणविरहित हवा, विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ-पोफळीच्या बागा, ऐतिहासिक जंजिरा व पद्मदुर्ग किल्ला, नवाब पॅलेस, उंच डोंगरावरील श्री दत्त मंदिर, खोकरीचे गुंबज आदी सौंदर्यस्थळे पाहण्यासाठी पर्यटकांची मुरूडमध्ये नेहमीच वर्दळ असते. पर्यटकांना चांगल्‍या सुविधा देण्यासाठी अनेक महिन्यांपासून समुद्रकिनारी सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यास पर्यटन व्यवसाय आणि त्‍याच्यावर आधारित उद्योगांना चालना मिळण्याची शक्‍यता आहे.
मुरूड-जंजिरा येथे लाखो पर्यटक दरवर्षी देश-विदेशातून येतात. नारळ, सुपारीच्या बागायती, वाड्या सोडल्या, तर अन्य उत्पन्नाचे साधन नसल्याने स्थानिकांना पर्यटनपूरक व्यवसायावरच अवलंबून राहावे लागते. पर्यटकांची संख्या वाढावी, त्यांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी मुरूड किनारा सुशोभीकरणासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी नगर परिषदेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. दसऱ्यापर्यंत सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र तांत्रिक बाबींमुळे कामांची गती मंदावली.
मावळतीचा मनोहर देखावा किनाऱ्यावर बसून न्याहाळता यावा, यासाठी पर्यटकांना आसन व्यवस्था केली आहे. एकाच वेळी ४०० वाहने उभी राहू शकतील, अशी वाहनतळाची व्यवस्‍था केली आहे. मऊशार वाळूत अनवाणी चालण्याचा अनुभव घेता यावा, यासाठी किनारा परिसरात नियमित स्‍वच्छता करण्यात येत आहे.
मुरूड समुद्रकिनारी असलेले हॉटेल्स, चायनीज सेंटर, पाणीपुरी-भेलपुरी स्‍टॉल, नारळ पाणी आदी स्टॉल्स खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत. समुद्रावरील घोडेस्वारी, स्‍पीड बोट, साहसी खेळ पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. नगरपालिकेचे समुद्रकिनारी असलेल्‍या विश्रामधाम या बागेचेही नूतनीकरण केल्याने वयोवृद्धांना दिलासा मिळाला आहे.
मुरूडचा जंजिरा किल्ला पाहण्यातही पर्यटक सकाळी लवकर जातात म्हणून पुरातत्त्व खात्याने तिकीट घर सकाळी आठ वाजता सुरू केले आहे, त्‍यामुळे सकाळी १० वाजेपर्यंत जंजिरा किल्ला पाहून पर्यटक बाहेर येतात. नवीन जेटी एप्रिलअखेर पूर्ण झाल्यास पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश करणे सोपे आणि सुरक्षित होणार आहे.

सुरूच्या झाडांचे संवर्धन होणार
पूर्वीच्या दगडी बंधाऱ्याची उंची कमी झाल्याने भरतीचे पाणी घुसून सुरूची झाडे उन्मळून पडली होती. आता या बंधाऱ्याची उंची वाढल्याने नवीन सुरूच्या झाडांची लागवड झाल्यास संवर्धन होण्यास मदत होईल, असा विश्‍वास परिसरातील व्यावसायिकांना आहे.

असा झाला कायापालट
मुरूड नगर परिषदेच्या योजनेतून ११ कोटी ४३ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या निधीतून किनारा सुशोभीकरण, वॉक वे, वाहनतळ व अनुषंगिक सुविधा करणे आदी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषद विश्रामगृहापासून दगडी बंधारा बांधण्यात आला आहे. लाटांचा मारा झेलणारा सुमारे दोन किलोमीटर लांबी आणि पाच फूट उंच बंधाऱ्याने समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला आहे.

पर्यटकांची आसन व्यवस्था, रोप लागवड, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, स्वच्छतागृह, सौरऊर्जेवर चालणारे दिवे, आकर्षक विद्युत रोषणाई तसेच समुद्रकिनाऱ्यावर नामफलक आणि सूचना फलकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी दोन भागांत चॉर्जिंग पॉइंट्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- सचिन बच्छाव, मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com