
उल्हासनगरातून बुधवारपासून शेगावची पदयात्रा
उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : शहरातील श्री गजानन महाराज मंदिराच्या वतीने येत्या बुधवारी (ता. ४) शेगावसाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, कोकण, पुणे भागातील ही एकमेव पदयात्रा असून ती सलग २१ वर्षांपासून श्रद्धाभावेने निघत आहे. वारीप्रमुख शलाखा निमकर यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघणार असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष जयकुमार केणी यांनी दिली. उल्हासनगरात कॅम्प नंबर ३ शांतीनगरात श्री गजानन महाराजांचे मंदिर आहे. पदयात्रेसंदर्भात मंदिरात नुकतीच बैठक पार पडली असून त्यात अध्यक्ष जयकुमार केणी, सचिव बाळकृष्ण कुलसंगे, खजिनदार माधवराव पाटील, वारीप्रमुख शलाखा निमकर उपस्थित होत्या. मुंबई, कोकण, पुणे परिसरातून येणारे भाविक या पदयात्रेत सहभागी होतात. तब्बल ५४२ किलोमीटर अंतर पार करून १८ दिवसानंतर भाविक २२ जानेवारी रोजी शेगावमध्ये दाखल होणार आहेत. २३ जानेवारी रोजी रेल्वेने परत येणार असल्याचे जयकुमार केणी यांनी सांगितले.