
महामार्गलगतची झाडे जळून खाक
खारघर, ता. ११ (बातमीदार) : कोपरा खाडी ते खारघर टोल नाका महामार्गालगत पदपथावर रात्रीच्या वेळी बेकायदा व्यवसाय केले जात आहेत. अशातच मंगळवारी रात्री या मार्गालगतची झाडे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांनीच ही आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
सायन-पनवेल महामार्गालगत सीबीडीकडून पनवेलकडे जाताना आणि पनवेलकडून सीबीडीकडे येताना कोपरा खाडी आणि खारघर टोल नाकादरम्यान पदपथावर दिवसा हेल्मेट, तर रात्रीच्या वेळी अंडाभुर्जीचा व्यवसाय करणाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. अशातच कोपरा खाडीकडून टोल नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला खाडी किनाऱ्यालगतची तीस ते चाळीस झाडे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहेत. या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमींकडून रस्त्यालगतच्या बेकायदा व्यवसायांवर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता खारघर वाहतूक पोलिसांना माहिती देऊन अशा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.