रायगडच्या प्रवेशद्वारावर वैश्य भवन बनणार

रायगडच्या प्रवेशद्वारावर वैश्य भवन बनणार

नेरळ, ता. १९ (बातमीदार) ः वैश्‍य समाजाचे भवन व्हावे, अशी मनापासून इच्छा होती. ती अशोक भोपतराव यांनी बोलून दाखवली. आता रायगड जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरच भवन होणार असल्‍याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. कर्जत येथे रायगड जिल्हा वैश्य समाज महिला संघटनेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बुधवारी ते बोलत होते.
कर्जत वैजनाथ येथे कार्यक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. गेली ११ वर्षे सलग हा कार्यक्रम जिल्ह्यात साजरा केला जातो, मात्र कोरोनामुळे २ वर्षे कार्यक्रम होऊ शकला नव्हता. यंदा कार्यक्रमाचे यजमान पद कर्जत तालुक्याचे असल्याचे मोठ्या जोमात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मंचावर उद्योजक विश्वनाथ पनवेलकर, रायगड जिल्हा वैश्य समाज संघटना अध्यक्ष अशोक भोपतराव, ठाणे पालघर वैश्य समाज संघटना अध्यक्ष विजय निकते, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय कोडलेकर, बालाजी दलाल, विलास मनोरे, दिलीप भोपतराव, राजाभाऊ पातकर, अंकित साखरे आदी उपस्थित होते.
पनवेलमध्ये वैश्य समाज प्रकल्पग्रस्त आहे. त्याकडे लक्ष देण्याची मागणी भोपतवार यांनी नार्वेकर यांच्याकडे केली. वैश्‍य समाज हा मोठा असून रायगड जिल्ह्यात आमदार होण्यासाठी आपल्या समाजाची मदत लागणारच आहे. वैश्य भवन सिडको क्षेत्रात व्हावे अशी इच्छा भोपतवारांनी बोलून दाखवली.
वैश्‍य समाज विखुरला असला तरी एकत्र येवून आपली ताकद दाखवू शकतो, हे या मेळाव्यावरून दिसून येते. या समाजाचे कौशल्य, धडाडी ही महाराष्ट्राने ओळखली आहे. समाजाच्या संस्कृतीबद्दल प्रेम, आदर आहे. ती जपण्याचे अविरत काम करा. विधानसभेचाच काय यापुढे लोकसभेचा देखील अध्यक्ष आपल्या समाजाचा होईल, तरुण पिढीसाठी नोकरी मेळावे आयोजित करा, अशा सूचना यावेळी नार्वेकर यांनी केल्‍या. यावेळी वैश्य समाज संघाचे युवा अध्यक्ष मनोज आंग्रे, उपाध्यक्ष राजेंद्र फक्के रवींद्र झिंजे, मिलिंद फोंडके, उदय मनोरे, दत्त तांबोळी युवा उपाध्यक्ष महेश झिंजे योगेश तांबोळी आदी उपस्थित होते.

समाजाकडून विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तर समाजातील काही व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले. तर मुख्य कार्यक्रमात समाजातील महिलांनी विविध नृत्याविष्कार सादर केला. चूल आणि मूल ही व्याख्या बदलत आजची स्‍त्री बंधनात नाही तर मोकळ्या वातावरणात जगत आहे, तिलाही विरंगुळा हवा, समाजातील स्त्रियांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी हक्काचे मंच हवे, हाच या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे शामल आंग्रे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com