
राजकारणातील मग्रुरी अजित पवार यांनी अनेकदा दाखवली
मुंबई, ता. २४ ः अजितदादांनी राजकारणातील मग्रुरी अनेकदा आपल्या विधानांमधून दाखवली आहे; तर अमोल मिटकरी यांच्याबाबत मुंगेरीलाल के हसीन सपने असेच म्हणावे लागेल, असा टोला भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
राज्य सरकार कोसळण्याबाबत मिटकरी यांनी केलेल्या विधानांवरून दरेकर यांनी त्यांच्यावर हल्ला चढवली आहे. संजय राऊत यांनीही यापूर्वी सतत अशाच तारखा देऊनही सरकारला सात महिने पूर्ण झाले. त्यामुळे हे सरकार सदैव विनाअडथळा चालण्यासाठी मिटकरी यांनीही असेच भविष्य सांगत राहावे, अशी गमतीदार टीकाही दरेकर यांनी केली. राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव गट) या पक्षातून सुरू असलेले आऊटगोईंग रोखण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
राजकारणातील मग्रुरी अजित पवार यांनी आपल्या विधानाने अनेकदा दाखवली आहे. जो विषय शांत झाला होता तरी पण मी माझ्या विषयाशी ठाम आहे दाखवून अरेरावी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शरद पवार यांनीही संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यास हरकत नाही असे सांगितले, त्याला छेद देण्याचा अजित पवारांचा प्रयत्न नाही ना, अशी शंका येत असल्याचेही दरेकर म्हणाले.
शिवसेनेने मुंबईकरांच्या घामाचा पैसा २५ वर्षे लुबाडला त्याचे प्रथम आदित्य ठाकरे यांनी उत्तर द्यावे; तर निवडणुकांबाबत संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे केवळ राजकीय नौटंकी आहे. निवडणुकांचे वेळापत्रक सरकार ठरवीत नाही; तरीही सर्व ताकदीनीशी भाजपा निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असून त्यांचा उद्देश सफल झाला आहे. त्यांची गांधी घराण्याशी असणारी जवळीक आता बाहेर येत आहे. राऊत काँग्रेसमय झाले असून त्यांनी लोकांमधून निवडून यावे, असे आव्हानही दरेकर यांनी दिले.