
बोलण्यात गुंतवून दागिन्यांची चोरी
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : महिलांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळ असलेले १ लाख १२ हजार रुपये किमतीचे दागिने लुटल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. दिघा आणि घणसोली येथे या घटना घडल्या आहेत. रबाळे एमआयडीसी व कोपरखैरणे पोलिसांनी या दोन्ही घटनेतील चोरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
दिघा येथील बिंदूमाधव नगरमध्ये राहणाऱ्या निर्मला चौरे (वय ३५) या ३० जानेवारी रोजी आपल्या दुकानात काम करत होत्या. या वेळी देवाच्या पूजेसाठी लाल रंगाचा कपडा विकत घेण्याच्या बहाण्याने आलेल्या एकाने निर्मला यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. तसेच, हातचलाखीने निर्मला यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ४ ग्रॅम वजनाची हातातील अंगठी असा ७२ हजार रुपये किमतीचा ऐवज लुबाडून नेला. दुसरी घटना घणसोलीत सेक्टर २ मध्ये घडली. येथे राहणाऱ्या लीलावती जयस्वाल (वय ४५) या घरकामासाठी जात असताना दोघांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. आपल्याकडे पैसे असून ते बँकेत भरायचे आहेत, असे त्यांनी लीलावती यांना सांगितले. हे पैसे बाजूच्या शौचालयात जाऊन मोजून द्यावेत, त्या बदल्यात तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र आमच्याजवळ असू द्यावे, असे दोघांनी सांगितले. यावर विश्वास ठेवून लीलावती रुमालात गुंडाळलेले पैशांचे बंडल घेऊन शौचालयात गेल्या. ते उघडून पाहिले असता त्यात कागद असल्याचे त्यांना आढळून आले. तोपर्यंत दोन्ही चोर मंगळसूत्र घेऊन पसार झाले होते.