राष्ट्रवादीच्या फुटीचा मुहूर्त ठरला

राष्ट्रवादीच्या फुटीचा मुहूर्त ठरला

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : गेले अनेक दिवस ठाण्यात सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या चर्चेला आता मूर्त स्वरूप देण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी १२ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरवण्यात आला असून या दिवशी मुंब्य्रातील काही माजी नगरसेवकांसह ठाण्यातील ज्येष्ठ माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यामुळे ठाण्यात पुन्हा एकदा राजकीय धमाका होणार आहे.
आव्हाड यांचे ट्विटर बॉम्ब, त्यानंतर कळवा परिसरात रंगलेले बॅनर युद्ध, या सर्व घडामोडींआधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवकांचे बाळासाहेबांची शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत मिळू लागले होते. त्यातच शनिवारी पालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर बसून १२ फेब्रुवारीला बारा वाजवणार, असा केलेला दावा आणि सायंकाळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला नजीब मुल्लांसह राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी लावलेली हजेरी, त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’ म्हणत केलेले ट्विट यावरून ठाण्यात राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. या काळात राष्ट्रवादीचे १२ ते १५ माजी नगरसेवक पक्षाला रामराम करणार असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे, पण राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार मुंब्य्रातील किणे कुटुंब आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्याव्यतिरिक्त एकही माजी नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागणार नाही. त्यामुळे १२ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे किती माजी नगरसेवक, पदाधिकारी पक्षांतर करतील याचे चित्र त्यादिवशीच स्पष्ट होणार आहे.
राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले. याचे पडसाद साहजिक ठाण्याच्या राजकारणावरही उमटले आहेत. ठाण्यातील काही मोजके माजी नगरसेवक सोडले तर ६० हून अधिक माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेनासोबत आहेत, पण मतांचे ध्रुवीकरण होणार असल्याने गेल्या ३० वर्षांपासून ठाणे महापालिकेवर असलेली सत्ता संपुष्टात येण्याची भीतीही आहे. यासाठी आता शिंदे गटाने आपली ताकद वाढवण्यासाठी नव्हे तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला कळवा-मुंब्रा काबीज करण्याची रणनीती आखली आहे. या दोन्ही उपशहरांमधून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत सत्तेची चावी कळवा- मुंब्रातील नगरसेवकांच्याच हाती असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या गडाला सुरुंग लावून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न बाळासाहेबांच्या शिवसेनेने सुरू केली आहे.

गटातटाचे राजकारण पथ्यावर
ठाण्यात वास्तविक सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण राहिले आहे. दिवंगत वसंत डावखरे, गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड हे तीन गट नेहमीच पाहायला मिळाले. वसंत डावखरे यांच्या निधनानंतर गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांचे राजकीय वजन वाढले. त्यात एकदा राज्यमंत्रीपद आणि त्यानंतर मंत्रीपद मिळाल्याने त्यांचा दबदबा वाढला. त्यामुळे काही ज्येष्ठ, जुनेजाणते नगरसेवक साईड ट्रॅकवर गेले. या दुखऱ्‍या नसचा उपयोग ठाण्यात आव्हाडांना घेरण्यासाठी आणि राष्ट्रवादीला फोडण्यासाठी सध्या कामी येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com