अत्याधुनिक शाळांसह शस्त्रक्रिया विभागाची उभारणी

अत्याधुनिक शाळांसह शस्त्रक्रिया विभागाची उभारणी

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सोयीसुविधा देण्यासह शस्त्रक्रिया विभाग देखील अत्याधुनिक असणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग उभारण्यात यावा. सांगली जिल्ह्याच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, मराठी शाळेतील पटसंख्या वाढावी यासाठी अत्याधुनिक शाळांची निर्मिती करण्यावर भर देण्यात यावा, असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी ठाणे जिल्हा नियोजन भवन येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समिती आढावा बैठकीत दिले.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण या तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयासह, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांवर असते. यासाठी ठाणे जिल्ह्यात तीन जिल्हा रुग्णालये, एक महिला रुग्णालय, चार उपजिल्हा रुग्णालय, सहा ग्रामीण रुग्णालये आहेत. अनेकदा उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेले अपघाताचे रुग्ण, गर्भवती माता अशा रुग्णांवर या रुग्णालयांमध्ये तात्पुरते उपचार करण्यात येत असतात. मात्र, शस्त्रक्रिया करण्याची वेळ पडल्यास जिल्हा रुग्णालयाकडे वर्ग करतात. त्यामुळे या दरम्यानच्या प्रवासात रुग्णांचा अनेकदा मृत्यू देखील होत असतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी ठाणे, भिवंडी आणि शहापूर या ठिकाणी अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाची उभारणी केली. त्यापाठोपाठ मुरबाड, गोवेली, बदलापूर, अंबरनाथ या रुग्णालयामध्येही अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग तयार करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित खर्डी आणि टोकावडे येथील काम प्रस्तावित होते. बुधवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय पटलावर येताच पालकमंत्री देसाई यांनी अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाच्या कामांचा आढावा घेतला. उर्वरित खर्डी आणि टोकावडे भागातही अशाचप्रकारे सुविधा निर्माण करण्याचे आदेश दिले.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या शाळांच्या नूतनीकरण तसेच इतर कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो. या निधीचा उपयोग शाळांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करण्यासाठी होत नसल्याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत नाराजी व्यक्त करीत, सांगली जिल्ह्याच्या धर्तीवर अत्याधुनिक शाळांची निर्मिती करण्यावर भर द्या, असे सांगितले. तसेच त्या शा‌ळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल आणि या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्याकडे पालकांचा वाढलेला कल याचा दाखला देखील यावेळी दिला. जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. त्यामुळे भविष्यात लवकरच ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेबरोबरच आरोग्य व्यवस्था अत्याधुनिक झाल्याचे दिसून येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.