पालघरचा समुद्रकिनारा होणार सुरक्षित

पालघरचा समुद्रकिनारा होणार सुरक्षित

प्रसाद जोशी, वसई
पालघर जिल्हातील सागरी भाग पाकिस्तान सीमेला लागून आहे. त्यामुळे अवैद्य बोटी किंवा संशयास्पद हालचालींना अचूक टिपण्यासाठी यापुढे ड्रोनद्वारे टेहळणीचा निर्णय मत्स्यविभागाने घेतला आहे. त्यामुळे पालघरचा समुद्रकिनारा अधिक सुरक्षित होणार आहे. तसेच या भागातील मच्छीमार व बोटींनादेखील दिलासा मिळणार आहे.
पालघर जिल्ह्यात ११२ किमीचा समुद्रकिनारा आहे. पण या सागरी किनाऱ्याच्या संरक्षणासाठी कोणतीच तरतूद नाही. यामुळे अनेकदा पाकिस्तानमधील बोटी भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याचे आरोप होत असतात. तर यापूर्वी पाकिस्तानी बोटीतून करण्यात आलेल्या गोळीबारात सातपाटी येथील दोघांचा मृत्यू झाला होता. तसेच विनाकारण पालघरमधील अटक देखील केली जाते. या स्थानिक मच्छीमारांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आमदार सुनील भुसारा यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट देखील घेत सीमेवर केंद्रीय सुरक्षा बल असावे, अशी मागणी देखील केली. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला. याची अंमलबजावणी झाल्यास पाकिस्तानमधून होणाऱ्या हालचाली वेळीच रोखणे शक्य होणार आहे. त्यामुळे ड्रोनचा प्रस्ताव देखील मत्स्य विभागाने तयार केला असून यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर लक्ष ठेवता येणार आहे. यासाठी निविदा देखील मागविण्यात आल्या आहेत.
पालघर, डहाणू, वसई पाचूबंदर, अर्नाळा, नायगाव, उत्तनपर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छीमारीचा व्यवसाय मोठ्याप्रमाणात केला जाते. हे मच्छीमार खोल समुद्रात जाऊन मासेमारी करतात. परंतु अनेकदा आंतरराष्ट्रीय सीमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांना पाकिस्तानकडून अटक केली जाते, त्यामुळे अशा मच्छीमारांना मायदेशी परतण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे या ड्रोन पाहणीचा उपयोग स्थानिक मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी होणार आहे. या ड्रोनच्या माध्यमातून मिळणारी माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली जाणार आहे. त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्याने पालघर जिल्ह्यातील समुद्रात खोलवर नजर ठेवण्यासोबत मच्छीमार बांधवांचे रक्षण आणि देशाच्या सीमेवर पाकचे गुपचूप कोणते कट कारस्थान होत आहेत, या याची माहिती मिळणे सोपे होणार आहे.
----
मच्छीमार बोटी आणि जाळींसाठी अनुदान
एकीकडे अनुदान मिळत नसल्याने मासेमारी व्यवसाय कसा करायचा हा प्रश्न सतावत असताना यापुढे फायबर बोटी, तयार बोटी आदींच्या खरेदीवर सुमारे दोन लाख ५० हजार तर जाळे खरेदीवर ५० टक्के अनुदान देण्याचे मत्स्यविभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मच्छीमार आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत होणार आहे.
-----------------------
ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी करून त्यानंतर संशयित हालचाली टिपल्या जातील. मात्र याचबरोबर केंद्रीय सागरी तटीय सुरक्षा बल पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून भविष्यात त्वरित संशयित हालचालीवर लक्ष व कारवाई करता येणार आहे. त्याचबरोबर मासे अन्य ठिकाणी पळवून नेणाऱ्या ट्रॉलर्सना रोखता येईल.
- सुनील भुसारा, आमदार
----------------------
मच्छीमारी करताना अनेक संकटे येत आहेत. एकीकडे माशांचे प्रमाण कमी होत आहे त्यातच परकीय अतिक्रमण होत असते. पण ड्रोनमुळे यावर लक्ष देता येईल. हा प्रस्ताव चांगला असून यामुळे मासेमारी करताना जर मच्छीमार बांधव नैसर्गिक संकटात अडकला तर त्याला सुखरूप सुटका करण्यासाठी प्रयत्न करता येतील.
- बर्नड डिमेलो, कार्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती
-----------------
ड्रोनचा फायदा
संशयित बोटीवर लक्ष
समुद्रातील हालचाली टिपणे शक्य
मच्छीमार अथवा बोट हरवल्यास शोध मोहिमेला गती
ट्रॉलर्स बोटींचे अतिक्रमण रोखण्यास मदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com