
रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा ; रस्ते खड्डेमुक्त करण्यात दिरंगाई नको!
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : खड्डेमुक्त ठाणे हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आतापासून कार्यकारी अभियंत्यांनी कामाला लागावे. पावसाळ्यात कोणत्या अडचणी येतात, त्यावर तोडगा काय आहे, हे आताच पाहून त्यांची कामे पूर्ण करावीत. रस्त्यांच्या कामात एक दिवसाचीही दिरंगाई नको, अशा स्पष्ट सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील खड्डेमुक्त ठाणे साकारण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. राज्य सरकारने दिलेल्या ३९१ कोटी रुपयांमधून होत असलेली १५६ कामे आणि इतर रस्ते यांच्या कामांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी (ता. १०) महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठक घेतली. या वेळी या बैठकीस नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपनगर अभियंता रामदास शिंदे, आयआयटीमधील प्राध्यापक के. व्ही. कृष्णराव, सर्व कार्यकारी अभियंते आणि कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
----------------
महापालिकेस ६०५ कोटी मंजूर
खड्डेमुक्त ठाणे या अभियानात शहरातील ८.५ किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, २६.६९ किलोमीटर रस्त्याचे यूटीडब्ल्यूटी पद्धतीचे काम व ४७.५१ किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण पद्धतीने पुनर्पृष्ठीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ३९१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यात एकूण ८२.७३ किलोमीटर रस्त्यांची १५६ कामे केली जाणार आहेत. हा निधी लगेच उपलब्ध व्हावा, यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने रस्त्यांसाठी ठाणे महापालिकेस एकूण ६०५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यात २२४ कोटी रुपयांच्या आणखी १२७ रस्त्यांच्या कामांचाही समावेश आहे.
--------------
प्रत्येक खड्ड्याला लाख रुपये दंड
कंत्राटदारांनी त्यांना मिळालेल्या सर्व रस्त्यांची कामे एकाच वेळी आणि त्वरित सुरू करावीत. कंत्राटदारांनी लक्ष्य निर्धारित करून त्याप्रमाणे उलट्या गणतीने काम सुरू करावे. तसेच या कामांसाठी वाहतूक पोलिसांची परवानगीही कार्यकारी अभियंत्यांनी आधीच घेऊन ठेवावी, अशा सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या. ३१ मे पूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर सक्त कारवाई करण्यात येईल. तसेच, दोष निवारण कालावधी (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) मध्ये रस्त्यावर खड्डा पडल्यास प्रत्येक खड्ड्यामागे (एक चौरस मीटर) एक लाख रुपयांचा दंड आकारला जाईल, अशा इशारा कंत्राटदारांना देण्यात आला.
---------------
त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट
ठाणे शहरातील रस्त्यांच्या कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी आयआयटीमधील प्रा. के. व्ही. कृष्णराव आणि त्यांची टीम काम पाहणार आहे. कामात काही त्रुटी असल्यास ही टीम त्या दुरुस्त करण्यासाठी मार्गदर्शनही करणार आहे. या बैठकीत, कृष्णराव यांनी त्यांच्या गुणवत्तेबद्दल असलेल्या अपेक्षा विस्ताराने सांगितल्या. रस्त्यावर काम करताना तो स्वच्छ करून घेणे, रस्ता पूर्ण झाल्यावर खडीचा वापर टाळणे, डांबर आणि सिमेंट काँक्रीट यांचे तापमान योग्य राखणे यावर लक्ष दिल्यास रस्ते दर्जेदार होतील, असे कृष्णराव म्हणाले. तसेच, रस्त्यावर भेगा पडल्याच्या तक्रारी कमी करण्यासाठी त्यांनी तांत्रिक उपायही सुचवला. एक्सपांशन जॉईंटचा वापर आता बंद झाला आहे. त्यामुळे ठाण्यातही ती पद्धत वापरली जाऊ नये, असे कृष्णराव यांनी सांगितले.
--