‘कल्याण’साठी मोर्चेबांधणी

‘कल्याण’साठी मोर्चेबांधणी

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे तीन महिन्यांपूर्वी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शहरांचे दौरे करत पक्ष संघटनाचा त्यांनी आढावा घेतला होता. आता दुसऱ्यांदा मंत्री ठाकूर हे मतदार संघाच्या दौऱ्यावर आले असून, या संघातील सहा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेत आहेत. ठाकुर यांच्या या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदार संघ चर्चेत आला आहे. भाजप या मतदार संघावर दावा करणार असल्याचे बोलले जात असतानाच मंत्री ठाकूर यांनी ‘एकत्रित जोरदार लढू आणि चांगला विजय संपादित करू’ असे वक्तव्य करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भाजपच्या गोटात वेगळीच खलबते शिजत असल्याचे बोलले जात आहे.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. २०२४ लोकसभा निवडणूका लक्षात घेता ज्या मतदार संघांत भाजपचे खासदार नाहीत अशा सर्व ठिकाणी केंद्रीय स्तरावरुन वरिष्ठ नेते पाठवून पक्षाचे संघटन मजबूत करण्याची रचना भाजपाने आखली आहे. केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्याकडे कल्याण लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली असून सोमवारी ते दुसऱ्यांदा या मतदार संघाच्या दौऱ्यावर आले आहेत. कळवा, मुंब्रा नंतर त्यांनी डोंबिवलीतील रोटरी भवन येथे आपला मुक्काम करत सहा ही विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
भाजपच्या गटातील या हालचालींमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपा दावा करणार या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. ठाकूर यांच्या मागील दौऱ्यात खासदार शिंदे यांनी त्यांचे स्वागत करत या मतदार संघाचा मीच दावेदार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता पुन्हा ठाकूर हे या मतदार संघात आले असून त्यांनी देखील एकत्रित लढू, जोरदार लढू आणि पहिल्यापेक्षा चांगला विजय मिळवू असे सुतोवाच दिले आहेत. कोण इथून लढणार कि इथला उमेदवार दुसरीकडून लढणार याची चिंता सोडून द्या असे देखील ते बोलले असल्याने खासदार शिंदे हे ठाण्यातून आगामी निवडणूक लढणार ? या प्रश्नाकडेही पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. या मतदार संघाचा विचार करता रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्या काळापासून येथे जनसंघाचा पगडा राहिला आहे. १९६०-७० च्या दशकापासून म्हणजेच नगरपालिका असल्यापासून येथे जनसंघाची रुजवात झाली आहे. पांढरपेशी समाज या भागात जास्त असल्याने तो संघ व भाजपची फिक्स वोटर बॅंक तयार झाली. लोकसंख्या वाढत गेली तसा मतदार देखील वाढत गेला. डोंबिवली विधानसभा मतदार संघ हा पहिल्यापासून भाजपचा बालेकिल्ला असून, आमदार रवींद्र चव्हाण हा गड राखून आहेत. कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड हे प्रथम अपक्ष लढले त्यांना भाजपने आपल्याकडे खेचून घेतले असून, आता ते भाजपचे आमदार म्हणून विजयी झाले आहेत. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात आमदार कुमार आयलानी हे भाजपचे आहेत. यामुळे कल्याण लोकसभेतील या तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपची पकड मजबूत आहे.
----------------------------------
राष्‍ट्रवादीची भूमिका गुलदस्‍त्‍यात
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे प्राबल्य नाही. ठाकुर यांनी आपल्या दुसऱ्या दौऱ्याची सुरुवातच मुंब्रा विधानसभा मतदार संघातून केल्याचे दिसून आले. या ठिकाणी राष्‍ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पक्षाचे काही नगरसेवक फोडल्याने आव्हाड हे शिंदे गटावर नाराज आहे. याठिकाणी लोकसभेला भाजपला मदत केल्यास विधानसभेला आव्हाड यांना मदतीचा छुपा हात पुढे करत शिंदे यांना आव्हान दिले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. कल्याण लोकसभेचे माजी खासदार आनंद परांजपे हे ही छुपा पाठिंबा भाजपला देऊ शकतात.
------------------------
मनसेच्‍या भूमिकेकडे लक्ष
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात मनसेचे राजू पाटील आमदार आहेत. सध्याच्या घडीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक पाहता, मनसेचे आमदार पाटील यांनी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांना मतदान केले आहे. त्यामुळे मनसेचा पाठिंबा भाजपला जाऊ शकतो. तर मुंब्रा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात माजी आमदार सुभाष भोईर यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. भोईर हे ही लोकसभेचे उमेदवार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून ग्रामीण परिसरात आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा कोणाला जातो हे पहावे लागेल. तसेच अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात शिंदे गटाचे बालाजी किणीकर हे आमदार असले तरी या भागात मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांची फळी मजबूत आहे.
----------------------------
कोणाचे पारडे जड
विधानसभा क्षेत्रांवर भाजपने आपले लक्ष आता केंद्रीत केले असून केंद्रीय मंत्री देखील विशेष लक्ष देऊन आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सरकार यांच्याकडून निवडणूका एकत्रित लढण्याचे सुतोवाच दिले जात असले तरी कल्याण लोकसभा मतदार संघ हा भाजपकडे यावा, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत आहे. या मागणीचा वरिष्ठ विचार करतात की शिंदे गटाचे पारडे जड ठरते हे आता पहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com